मृत्यूशी खेळ

Homeसंपादकीय

मृत्यूशी खेळ

कोरोना काळात उपचाराअभावी अनेकांचे मृत्यू झाले. काहींना उपचार मिळाले; परंतु त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची लढाई मध्येच संपली. योग्य उपचार करूनही मृत्यू झाले, तर ते एकवेळ क्षम्य मानता येईल; परंतु यंत्रणेच्या हलगर्जीपणाने तसेच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या प्रकाराने जर मृत्यू होत असतील, तर त्यावर गांभीर्याने कारवाई करायला हवी; परंतु सरकारी यंत्रणा अशा नराधमांना अनेकदा पाठीशी घालत असतात, हे उघड झाले आहे.

प्रजासत्ताकापुरते प्रजासत्ताक
भाजपच्या सामाजिक अन्यायावर शिक्कामोर्तब !
जुन्या पेन्शनचा नवा शंखनाद

कोरोना काळात उपचाराअभावी अनेकांचे मृत्यू झाले. काहींना उपचार मिळाले; परंतु त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची लढाई मध्येच संपली. योग्य उपचार करूनही मृत्यू झाले, तर ते एकवेळ क्षम्य मानता येईल; परंतु यंत्रणेच्या हलगर्जीपणाने तसेच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या प्रकाराने जर मृत्यू होत असतील, तर त्यावर गांभीर्याने कारवाई करायला हवी; परंतु सरकारी यंत्रणा अशा नराधमांना अनेकदा पाठीशी घालत असतात, हे उघड झाले आहे. कोरोनाच्या काळात सरकारी आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. 


अशा वेळी ठिकठिकाणी अनेकांनी कोरोना उपचार सुरू केले; परंतु असे करताना त्यांच्याकडे मूलभूत सुविधा आहेत, की नाहीत, तिथे प्रशिक्षित कर्मचारी आहेत का, याची खातरजमा करण्याचे काम सरकारी यंत्रणेचे होते. तसे ते झाले नाही. कुठेही कोविड सेंटर उभी राहिली. तिथे अग्नीशमन सुरक्षा यंत्रणेचा अभाव आढळला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात कोविड सेंटरला लागलेल्या आगीत अनेकांचा बळी गेला. एखाद-दुसरा अपघात समजण्यासारखे असते; परंतु वारंवार जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा त्याकडे गांभीर्यानेच पाहायला हवे. तसे ते पाहिले जात नाही. कोरोनाच्या संकटात सर्व यंत्रणा गुंतल्याचे कारण पुढे केले जाईल; परंतु कोरोना व्यवस्थापनात सुरक्षिततेचा, योग्य उपचाराचाही समावेश होतो आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनामुळे देशात असलेला मृत्यूदर, राज्यात असलेला मृत्यूदर यापेक्षा एखाद्या ठिकाणी तो फारच जास्त असेल, तर त्याची लगेच चौकशी करायला हवी. अधिक मृत्यू होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही; परंतु आरोग्य विभाग, टास्क फोर्स आणि सरकारच्या अन्य यंत्रणेच्या ते लक्षात कसे आले नाही, हा प्रश्‍न उरतोच. महाराष्ट्रातील मिरजेची घटना असो, की उत्तर प्रदेशातील आग्रा येथील; दोन्ही ठिकाणी वृत्ती सारखीच दिसते. महाराष्ट्रात किमान संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तरी दाखल झाला. अर्थात त्यामुळे गेलेले 87 जीव परत येणार नाहीत. उत्तर प्रदेशात तर 22 जणांच्या मृत्यूचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांच्या काळात 87 कोरोना रुग्ण दगावल्याप्रकरणी डॉ. महेश जाधव याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली सांगली पोलिसांनी नाट्यमयरीत्या अटक केली. मिरजेतील अ‍ॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात दोन महिन्यांत तब्बल 45 टक्के मृत्युदराने 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. अ‍ॅपेक्समधील रुग्णांच्या मृत्यूचे जिल्हा शल्यचिकित्सक डेथ ऑडिट करणार असून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची समिती रुग्णांवर केलेल्या उपचारांच्या कागदपत्रांची छाननी करणार आहे. हा वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिकेकडून कोविड रुग्णालयाच्या परवाना घेऊन डॉ. महेश जाधव याने मिरजेतील सांगली रस्त्यावर भाड्याच्या जागेत रुग्णालय सुरू केले होते. गेल्या वर्षीही येथे 40 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; परंतु येथे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने दुसर्‍या लाटेतही डॉ.जाधव याचे कोविड हॉस्पिटल बिनबोभाट सुरू होते. अ‍ॅपेक्स रुग्णालयात उपचार घेणार्‍या 205 रुग्णांपैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून येथील मृत्यूदर तब्बल 45 टक्क्यांपर्यंत आहे. मिरज सिव्हिलमध्ये 350 रुग्णांवर उपचार सुरू असून मे महिन्यात 20 टक्के व सध्या 15 टक्के मृत्यूदर आहे. अ‍ॅपेक्स रुग्णालयाचा मृत्युदर सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून चुकीच्या औषधोपचारामुळे हा मृत्युदर सर्वाधिक आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. रुग्णालयात केलेल्या उपचारांच्या चौकशीसाठी डॉ. शिशीर मिरगुंडे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. येथील रुग्णांच्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत होणार आहे. पोलिसांनीही रुग्णांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाची मागणी केली आहे. उपचाराबाबत वारंवार येणार्‍या तक्रारींमुळे मनपा प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानंतर डॉक्टरने रुग्णांच्या जिवाशी केलेला खेळ उघडकीस आला आहे. अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसतानही दोन महिन्यांत 205 रुग्ण दाखल करून घेण्यात आले. त्यापैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील पारस रुग्णालयातील मृत्यूच्या मॉकड्रिलच्या चौकशीबाबतही प्रश्‍नचिन्ह आहे. दोन दिवसांऐवजी चार दिवस उलटून गेले तरीही तपासाची पातळी पहिल्या दिवसासारखीच आहे. अशा संवेदनशील प्रकरणाची चौकशी समितीत उपस्थित असलेला एसीएमओ अचानक रजेवर गेला आहे. आग्रा येथील पारस हॉस्पिटलचे ऑपरेटर डॉ. अरिंजय जैन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ऑक्सिजन थांबविण्यासाठी मॉकड्रिल करून 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची कबुली अरिंजय देत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून जिल्हाधिकारी प्रभू नारायण सिंह यांनी रुग्णालय चालकाला वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचा आरोप आहे. पहिल्याच दिवशी, व्हिडिओच्या बाबतीत, त्यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला नसल्याचे आणि 26 आणि 27 एप्रिल रोजी केवळ सात मृत्यूने असे सांगून रुग्णालयाला क्लीन चिट देण्यास सुरुवात केली. 8 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. 8 जून रोजी काही तासातच जिल्हा दंडाधिकार्‍यांनी 22 जणांच्या मृत्यूच्या आरोपाखाली डॉक्टरला क्लीन चिट दिली आणि साथीच्या कायद्याविरूद्ध गुन्हा दाखल करून रुग्णालयात शिक्कामोर्तब केले आणि तेथे ऑक्सिजनची कमतरता असल्याचा दावा केला. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. कोणाचेही जबाब घेतले नाहीत. आतापर्यंत रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले नाहीत किंवा रुग्णालयाच्या नोंदीही तपासल्या गेल्या नाहीत. 

COMMENTS