Homeताज्या बातम्या

महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास500 कोटींच्या निधीत कोणतीही दलाली होणार नाही : सदा सरवणकर

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि परिसराचा सर्वांगीण विकास मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर करण्य

आरपीआयचे पदाधिकारी अनिल मोरे यांची हत्या
तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ


मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि परिसराचा सर्वांगीण विकास मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असून, या निधीचा वापर विविध विकासकामांसाठी करण्यात येणार आहे.
मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरवणकर यांनी सांगितले की, विकासकामे टप्प्याटप्प्याने राबवली जातील. प्रारंभीच्या टप्प्यात सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांची कामे हाती घेतली जाणार आहेत. राखीव ठेवलेला संपूर्ण निधी खर्च होईलच असे नाही, मात्र आवश्यकतेनुसार विविध सुविधा उभारल्या जातील. सरवणकर यांनी स्पष्ट केले की, 500 कोटी रुपयांचा निधी थेट सिद्धिविनायक न्यासाकडे जमा होणार नसून तो महानगरपालिकेमार्फतच खर्च केला जाईल. त्यामुळे निधीबाबत पसरवल्या जाणार्‍या गैरसमजांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मते, राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहे. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येत असून, सर्व कामे नियमानुसार आणि प्रशासकीय प्रक्रियेनुसार पूर्ण केली जातील. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या बाह्य परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी अधिक सोयी-सुविधा आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यावर भर दिला जाणार आहे. मंदिरासमोरील प्रवेशव्यवस्था अधिक आकर्षक आणि सुस्थितीत करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर परिसरातील वाहनतळाची समस्या लक्षात घेऊन भाविकांसाठी आधुनिक वाहनतळ सुविधा निर्माण करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, परिसराचे सौंदर्यीकरण आणि भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
प्रकल्पावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना सरवणकर म्हणाले की, या कामांमध्ये कोणतीही दलाली किंवा टक्केवारी घेतली जाणार नाही. अशा प्रकारचे आरोप करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. काही व्यक्तींचा प्रकल्पाशी संबंध नसतानाही ते विरोधासाठी विरोध करत असल्याची टीकाही त्यांनी केली. संपूर्ण विकास प्रकल्प दोन ते तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार असून, पुढील दोन वर्षांत बहुतांश कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनासोबत लवकरच पुढील बैठका घेण्यात येणार असल्याचे सरवणकर यांनी सांगितले.

COMMENTS