‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?

1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षां

शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरले |LokNews24

1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षांनी अस्तित्वात येऊन लागू झाले. भारतीय संविधानाने आपल्या प्रस्तावनेत जे काही सांगितले ते भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार. यात स्वातंत्र्य हे विचार, अभिव्यक्ती, निष्ठा, श्रध्दा-पूजा यांचे असेल. याचाच अर्थ प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माच्या अनुषंगाने श्रध्दा ठेवण्याचे आणि पूजा करण्याचेही स्वातंत्र्य मिळाले. आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासही संविधान स्वातंत्र्य देते; फक्त त्यात इतर धर्माविषयी टिका नको आणि कुणालाही जबरदस्तीने धर्मांतर नको. एवढ्या अटी पाळून भारतात धार्मिक स्वातंत्र्य आहे. मात्र, संविधान लागू झाल्यापासून या देशांत संघ परिवाराने संविधान विरोधीच भूमिका घेतली आहे. संविधानविरोधी भूमिका घेणार्‍या संघपरिवाराची कोअर टीम ज्या जातसमुहातून येते ती ब्राह्मण जातीचे संरक्षण कवच आजपर्यंत संविधानच राहिले आहे. किंबहुना, संविधान आणि कायदा यांचा सामाजिक पातळीवर दुरूपयोग करित त्यांनी आपली जातीय सत्ता स्थापित करून ठेवली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला विरोध किंवा मंडल आयोग लागू केल्यानंतर त्यास न्यायपालिकेत नेऊन ओबीसींवरचा सामाजिक अन्याय कायम ठेवण्याचे काम ही त्यांनी संवैधानिक कायद्याच्या अंतर्गतच केले. संविधानाला त्यांचा विरोध हा ब्राह्मणी राज्य प्रस्थापनेसाठी आहे. परंतु, ते थेट करता येत नसल्याने त्यांनी भारतातील बहुजन समाजाला हिंदू म्हणून आपल्यासोबत जोडून घेतले आहे. त्यांची ही चलाखी शिक्षित होत असलेल्या बहुजनांच्या लक्षात येत असल्यामुळे ते मध्येच ’ हिंदू खतरे में’ असा आलाप द्यायला लागतात. या आलापात इतर धर्मियांचा द्वेष अधिक असतो. ब्राह्मणी धर्म हा मानवता नाकारणारा आणि विषमताग्रस्त असल्याने त्याचे धर्मग्रंथ ते इतर धर्मियांसारखे सोप्या भाषेत भाषांतरित करून इतरांना वाटप करू शकत नाही. त्यामुळे, त्यांनी शक्कल लढवली मुस्लिम द्वेष, ख्रिश्‍चन द्वेष म्हणजेच इतर धर्मियांचा द्वेष करून आपले वर्चस्व स्थापित करून ठेवतात. बजरंग दला सारखं दल निर्माण करून त्यांनी खास करून ख्रिश्‍चन समुदायावर किंवा ख्रिश्‍चन धर्मगुरूंवर मोठ्याप्रमाणात हल्ले चालवले आहेत. फादर स्टेन आणि त्यांच्या मुलांचा इतिहास तर आपणांस माहीत आहेच. ख्रिश्‍चन धर्मप्रसारक यांच्यावरील त्यांचे हल्ले हा एक प्रचंड गुंतागुंतीचा विषय. कारण, श्रीमंत असणारा कॅथोलिक पंथात या देशात सर्व प्रथम या देशात कोणी धर्मांतर केले असेल तर ते ब्राह्मण. गोव्यात ख्रिश्‍चन जे आहेत ते ब्राह्मणांमधून झाले. कोलकाता येथील संस्थेचा या मदर तेरेसा यांचा वारसा चालवणार्‍या निर्मला या देखील मुळच्या ब्राह्मण. ब्राह्मणांचा ख्रिश्‍चन धर्मप्रसाराला जो विरोध दिसतो तो खासकरून आदिवासी भागात. कारण आदिवासी भागात प्रोटेस्टंट ख्रिश्‍चन शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा प्रामुख्याने देतात. ख्रिश्‍चन मिशनरी शाळेतून कितीतरी आदिवासी प्रगत झाले. संघाला ही गोष्ट खूपते. अन्यथा भातंब्रेकर, शाहू मोडक, रेव्हरंड टिळक, फर्नांडिस, आदि नावे जर आपण पाहिली तर ब्राह्मण जातीतून ख्रिश्‍चन झालेली ही नावे आहेत. एकंदरीत पाहता संविधानामुळेच सुरक्षित असणार्‍या संघाच्या कोअर जातीसमुहाने संविधानाचे राज्य सुरू असताना जो काही हिंसाचार इतर धर्मियांच्या विरोधात चालवला आहे, तो ताबडतोब थांबवला पाहिजे. अन्यथा, संविधान विरोधी कृत्य करणार्‍यांविषयी न्यायालयाचे दरवाजे ही आता ठोठावले पाहिजे. बहुजन समाजातील युवकांनी आपल्या आयुष्याला घडविण्यात आपले योगदान द्यावे. इतरांच्या धर्मद्वेषातून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जातेय. आज आर्थिक सत्ता ताब्यात घेऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले जातेय. कोरोना काळात बारा कोटी रोजगार गेले. गेल्या एक वर्षात तीन कोटी तरूण बेरोजगार झाले. अर्थसंकल्पात तरूणांना नोकर्‍या नाहीत. याचा मूलभूत विचार बहुजन तरूणांनी करावा. भारतीय संविधानापेक्षा ना राज्यसत्ता मोठी ना कोणती हिंसक संघटना मोठी. आजच्या काळात आर्थिक सुबत्ता हीच सत्ता असे समिकरण झाले आहे, याचे बहुजन तरूणांनी आत्मचिंतन करावे.

COMMENTS