Homeताज्या बातम्यासंपादकीय

तापमानवाढ चिंताजनक  

देशामध्ये एप्रिल महिन्यापासून ते जूनदरम्यान उष्णतेची तीव्र लाटेचा इशाराच हवामान विभागाने दिल्यामुळे पुन्हा एकदा तापमानवाढीची चिंता दिसून येत आहे.

तापमानवाढीतील बदल
हलगर्जीपणाचे बळी
अस्मानी संकट

देशामध्ये एप्रिल महिन्यापासून ते जूनदरम्यान उष्णतेची तीव्र लाटेचा इशाराच हवामान विभागाने दिल्यामुळे पुन्हा एकदा तापमानवाढीची चिंता दिसून येत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये शतकातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून या वर्षाची नोंद केली होती. मात्र 2023 चा रेकॉर्ड शतकभर अबाधीत राहण्याची शक्यता तशी कमीच. कारण यंदा 2024 मध्ये एप्रिलमहिन्यातच प्रचंड उन्हाच्या झळा जाणवतांना दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे, त्यावर हवामान विभागाने शिक्कामोर्तब केल्याचे दिसून येत आहे. तापमानवाढीला मानवप्राणी जबाबदार आहे. असे असूनही या गंभीर प्रश्‍नांकडे आपण डोळेझाक करतांना दिसून येत आहे. तापमानवाढीस सर्वात प्रमुख बदल म्हणजे हवामानातील बदल आणि वाढती लोकसंख्या. भारतासारख्या देशाने चीनला देखील मागे टाकत 142 कोटी लोकसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पृथ्वीवर नैसर्गिक संसधानाची पुर्तता करण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यातूनच मग पर्यावरणाचा र्‍हास होतांना दिसून येतो. लोकसंख्या वाढ हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अघोरी वापर सुरू आहे. जंगले कमी होत आहेत. ऊर्जा उत्पादनासाठी कोळशाचा मोठा वापर केला जात आहे. जशी जशी लोकसंख्या वाढत आहेत तशी झपाट्याने नैसर्गिक संपत्ती नष्ट होत आहे. जंगले कमी होत आहे. खाण्यापिण्याचे स्रोत वाढविण्याचा दबाव आहे. कार्बनचे उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमानात चिंताजनक वाढ होत आहे. नैसर्गिक चक्र बदलले आहे. अति उष्णता, अति पाऊस यामुळे सगळे नैसर्गिक चक्र विस्कळीत झाले आहे. त्यामुळे वृक्षारोपण महत्वाचे आहे. वास्तविक पाहता तापमानवाढीचे चक्र रोखण्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. ज्या पद्धतीने उष्णता वाढत आहे याचा परिणाम हवामानावर, पर्यावरणावर होत आहे. जिवितांना देखील याची बाधा होणार आहे. त्यामुळे धोरणात्मक उपाययोजना करण्यासाठी कृती करण्याची खरी गरज आहे. दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबविली जाते, मात्र त्यातील किती झाडे जगवले जातात, हा यक्षप्रश्‍नच आहे. जागतिक तापमानवाढ रोखायची असेल तर प्रामुख्याने दोन उपाययोजना कराव्या लागतील. एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण तर दुसरे म्हणजे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलाखालील भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. सध्याच्या युगात कोणताही देश ऊर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पाहणीनुसार विकसित देशांचा ऊर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे ऊर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत, चीन या देशांत दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लक्षणीय प्रमाणात वाढते आहे.ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. या ज्वलनातून कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात जाण्यापासून रोखणार्‍या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळशाच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डाय-ऑक्साइड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डाय-ऑक्साइड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डाय-ऑक्साइड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत. त्याचा अवलंब करून या बाबी करता येईल, तरच तापमानवाढ रोखता येईल. नवीन ऊर्जास्त्रोतांची निर्मिती करावी लागणार आहे, त्यासोबतच कोळशाचा वापर देखील कमी करावा लागणार आहे, तरच तापमानवाढ रोखणे काही प्रमाणात शक्य होणार आहे.    

COMMENTS