मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रल

मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत प्रलंबित प्रश्न व थकीत व्याज परताव्याच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 28 मार्च रोजी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाजातील तरुणांना उद्योग व व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या महामंडळाची स्थापना केली. या योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महामंडळाच्या कामकाजात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. महामंडळाकडून कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या लाभार्थ्यांना मिळणारा नियमित व्याज परतावा अचानक बंद झाल्याने नवउद्योजकांवर बँकांच्या व्याजाचा आर्थिक भार वाढला असून त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचे डॉ. मेटे यांनी म्हटले आहे. तसेच कर्जासाठी अर्ज केल्यानंतर ‘एलओआय’ (ङशीींंशी ेष खपींशपीं) मिळण्यासाठी निश्चित कालमर्यादा नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेकदा किरकोळ तांत्रिक त्रुटी दाखवून व्याज परताव्याचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे व्याज परताव्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून प्रशासनाची प्रक्रिया अधिक सुलभ व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, आजतागायत या संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने आता डॉ. ज्योती विनायकराव मेटे या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

COMMENTS