पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर रविवारी काळाने घाला घातला. अहिल्यानगर-सोलापूर महाम

पेरणीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आष्टी तालुक्यातील दोन चुलत भावांवर रविवारी काळाने घाला घातला. अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावरील वाळुंज पारगाव शिवारात भरधाव ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने वेदांत अशोक फंड (वय 20,रा. केरूळ,ता. आष्टी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.तर त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश बाबासाहेब फंड (वय 23) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,वेदांत आणि ऋषिकेश हे दोघे रविवारी दुपारी शेतातील पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रथम मिरजगाव येथे गेले होते.मात्र,तेथे आवश्यक साहित्य उपलब्ध न झाल्याने ते दुचाकीवरून अहिल्यानगरकडे निघाले. वाळुंज पारगाव शिवारात पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि वेदांतचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्ठवेदांत फंड हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शेतीच्या कामात तो कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या अकाली निधनाने फंड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून केरूळ गावावर शोककळा पसरली आहे.रविवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.वृद्ध आई- वडिलांचा आणि बहिणीचा आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून जात होते.

COMMENTS