Homeताज्या बातम्यादेश

सीमावाद प्रश्‍न चिघळला !

कानडी संघटनांचा उच्छाद महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक

बेळगाव प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव वाढला असतांनाच, मंगळवारी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील दोन म

मोरबीची दुर्घटना : मानवी जीवन मूल्ये पायदळी !
पद्मकांत कुदळे व शिलाताई कुदळे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या 72 तासात दिली शिक्षा | LOKNews24

बेळगाव प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात तणाव वाढला असतांनाच, मंगळवारी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील दोन मंत्री बेळगावमध्ये जाणार होते. मात्र वातावरण तणावपूर्ण होऊ नये, यासाठी हा कार्यक्रमाच रद्द करण्यात आला. त्यामुळे वातावरण निवळेल असे वाटत असतांनाच, मंगळवारी कानडी संघटनांनी बेळगावजवळ उच्छाद मांडला. तसेच महाराष्ट्राच्या 6 ट्रक अडवून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. शिवाय कानडी संघटनेचे कार्यकर्ते आपले झेंडे घेऊन या ट्रकवर जाऊन त्यांना अडवून ठेवले होते. त्यामुळे या प्रकाराची महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली आहे.
कानडी संघटनांनी बेळगाव जवळच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कानडी संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे मंगळवारी बेळगाव दौर्‍यावर जाणार होते.

त्या पार्श्‍वभूमीवर कानडी संघटनांचा विरोध आणि मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरीदेखील कानडी संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे.  महाराष्ट्राला डिवचण्याचे काम कन्नड रक्षण वेदिकेकडून करण्यात येत आहे. अशाच घटना सुरू राहिल्यास महाराष्ट्रातूनही त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटकमधील आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून बेळगाव आणि सीमाभागाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्ये करून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. कर्नाटक सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलतील असेही त्यांनी म्हटले. शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला.

कानडी संघटनांची मुजोरी – कानडी संघटनांमुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी कानडी संघटना जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्रातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसेच लाल- पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनांनी केले. कन्नड संघटनाना वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील, असा इशारा यावेळी मराठी भाषिकांनी दिला

शरद पवार यांचा बोम्मई यांना 24 तासांचा अल्टीमेटम – महाराष्ट्रातील ट्रकवर कानडी संघटनांनी केलेल्या दगडफेकीनंतर राज्यातील वातावरण संतप्त बनले आहे.  येत्या 24 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणे, त्यांना त्रास देणे थांबवण्यात आले नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 24 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला आहे.

COMMENTS