मुंबई : राज्यात इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून, याच वेळी कांदा उ

मुंबई : राज्यात इंधन साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून, याच वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही जण केवळ राजकीय लाभासाठी गळचेपी करत असल्याचा आरोप केला. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही, तेच आता शेतकऱ्यांच्या नावावर सहानुभूती दाखवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कांदा खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून, खरेदी दरात सुमारे साडेतीन रुपयांची वाढ करून तो जवळपास पंधरा रुपयांपर्यंत नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे विशेष बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवर दीर्घकालीन उपाययोजनांबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात पेट्रोल आणि डिझेल खरेदीत अचानक वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलच्या मागणीत सुमारे तेवीस टक्के वाढ झाली असून डिझेलची मागणी बावन्न टक्क्यांनी वाढली आहे. काही भागांत इंधन पुरवठ्यात सत्तर टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे. ही परिस्थिती नैसर्गिक नसून काही ठिकाणी साठेबाजी सुरू असल्याचा संशय प्रशासनाला आहे. त्यामुळे पुरवठा विभाग आणि गृह विभागाला संयुक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अफवा आणि भीतीमुळे नागरिक अतिरिक्त इंधन खरेदी करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COMMENTS