मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वा
मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या गुन्ह्याची तुलना आंबा चोरीशी करत शिक्षा गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ठरत असते, असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेत 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय का? असा प्रतिसवाल केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर आरोप करताना सांगितले की, प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून अधिवेशनाचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात त्यांनी, देशात प्रश्नपत्रिका फुटू नयेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र एखादा गुन्हा घडला म्हणून प्रत्येक वेळी एकाच प्रकारची शिक्षा असू शकत नाही. जसा आंबा चोरल्याबद्दल फाशीची शिक्षा होत नाही, तसेच प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप आणि शिक्षा वेगवेगळी असते, असे मत व्यक्त केले. पाटील म्हणाले की, संबंधित परीक्षा पुन्हा घेण्यात आली, त्यानंतर प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि निकालही जाहीर झाले. प्रवेश प्रक्रिया पुढे सुरू असतानाही या विषयाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, समाजात संभ्रम निर्माण करून अधिवेशनातील महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊ न देणे, हा विरोधकांचा उद्देश आहे. यावेळी त्यांनी काही शक्ती देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा केला. काही बाबी सार्वजनिकरीत्या सांगता येणार नसल्या तरी या घटनांमागील दुवे दूरपर्यंत जात असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. तसेच प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशी विधाने संतापजनक
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडित गंभीर प्रकरणाची तुलना आंबा चोरीसारख्या किरकोळ उदाहरणाशी करणे असंवेदनशील असल्याचा आरोप मनसेने केला. विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि भवितव्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची गरज असताना अशा प्रकारची विधाने संतापजनक असल्याचे पक्षाने म्हटले. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापले असताना या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार मिळाली आहे.

COMMENTS