मुंबई : मार्चच्या अखेरीस राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच आता हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अवकाळी

मुंबई : मार्चच्या अखेरीस राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच आता हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाची चाहूल लागली असून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः मोकळ्या जागेत किंवा झाडांखाली उभे राहणे टाळावे, असेही सुचवण्यात आले आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली आणि सोलापूर येथेही पावसाच्या सरींसह वादळी वार्यांचा प्रभाव जाणवू शकतो. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागांतही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्यांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक दोघांनाही नव्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ऊन आणि पावसाचा खेळ
राज्यात सध्या एकीकडे कडक उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे अचानक पाऊस आणि वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. काही भागांत दमट उष्णता कायम राहण्याची शक्यता असून या दुहेरी हवामानामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेणे, पावसाळी संरक्षण साधने जवळ ठेवणे आणि हवामानाच्या सूचना लक्षात घेणे गरजेचे ठरत आहे.

COMMENTS