नांदेड : शहरात सध्या चर्चेत असलेल्या कॅप्टन खरात प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, महिला संघटना आणि विरोधी पक्षांची भू

नांदेड : शहरात सध्या चर्चेत असलेल्या कॅप्टन खरात प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, महिला संघटना आणि विरोधी पक्षांची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. एखाद्या प्रकरणात महिलांवर अन्याय झाल्याचा आरोप होत असेल, तर अशा वेळी आक्रमक भूमिका घेणार्या संघटनांची या प्रकरणात दिसणारी शांतता अनेकांना खटकणारी ठरत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर या निमित्ताने होत असणारे आरोप पाहता राज्यभर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कॅप्टन खरात प्रकरणाची व पीडित महिलांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेणे अपेक्षित मानले जात आहे. महिलांवरील अन्यायाच्या प्रकरणांत तत्परतेने हस्तक्षेप करणारी यंत्रणा म्हणून आयोगाकडे पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी, तथ्यांची पडताळणी आणि गरज भासल्यास प्रशासनाला निर्देश देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. त्यांच्या भूमिकेमुळे पीडितेला न्याय मिळण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते तसेच समाजात योग्य संदेश जाईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
महिला हक्क, सन्मान आणि न्यायासाठी सातत्याने आंदोलन करणार्या विविध महिला संघटनांकडून या प्रकरणात ठोस भूमिका अपेक्षित होती. अनेकदा किरकोळ प्रकरणांवरही रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करणार्या या संघटना कॅप्टन खरात प्रकरणात मात्र अद्यापपर्यंत कोणतेही ठोस आंदोलन, निवेदन किंवा सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नाहीत. त्यामुळे निवडक प्रकरणांवरच आवाज उठवला जातो का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांची भूमिका देखील तितकीच गोंधळात टाकणारी आहे. सत्ताधार्यांवर सतत टीका करण्यासाठी सज्ज असलेले विरोधक या संवेदनशील प्रकरणात शांत का आहेत, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्या मुद्द्यावर राजकीय दबाव, अंतर्गत समीकरणे किंवा स्वार्थी भूमिका यामुळेच ही शांतता आहे का, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
सामाजिक माध्यमांवर देखील या प्रकरणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी महिला संघटना आणि विरोधी पक्षांवर दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे. न्यायासाठी आवाज उठवताना पक्ष, व्यक्ती किंवा परिस्थिती न पाहता ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे, अशी मागणीही पुढे येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू असल्याचे समजते. सत्य परिस्थिती तपासातून समोर येणार असली, तरी तोपर्यंत समाजातील जबाबदार घटकांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा मौनामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरीत, कॅप्टन खरात प्रकरण हे केवळ एक व्यक्ती किंवा घटनेपुरते मर्यादित राहिले नसून, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या भूमिकेचीही कसोटी ठरत आहे. आता येणार्या काळात या सर्व घटकांची भूमिका स्पष्ट होते का, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS