बिलोली: बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध व ओव्हरलोडिंग रेती वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्म

बिलोली: बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध व ओव्हरलोडिंग रेती वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा या मार्गावरील वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा केसराळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू केसराळीकर यांनी दिला आहे.
मांजरा नदी पात्रातील वाळू घाटांवरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, त्यात ओव्हरलोडिंगचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे सगरोळी, दौलतापूर, हिप्परगाथडी, केसराळी, खतगाव आदी गावांतील नागरिकांना सतत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. भरधाव वेगाने धावणार्या हायवा व इतर जड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रस्त्यालगत राहणार्या नागरिकांच्या आरोग्यावरही धुळीमुळे विपरीत परिणाम होत आहे. अलीकडेच महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीने सगरोळी, गंजगाव, येसगी येथील वाळू घाटांची पाहणी केली होती. या वेळी समितीचे अध्यक्ष आ. अर्जुन खोतकर यांनी अवैध रेती साठा व वाहतुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, त्या कारवाईचे काहीच झाले नसल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. समितीची पाहणी संपताच दुसर्याच दिवशी पुन्हा अवैध व्यवसाय सुरू झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, महसूल व परिवहन विभागाच्या कथित पाठबळामुळेच हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहनचालक ओव्हरलोडिंगसह भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. बुधवार (दि. 15 एप्रिल) रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता दौलतापूरजवळ उॠ 04 गऊ 9198 क्रमांकाचा हायवा पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली; मात्र अशा घटनांमुळे धोका किती मोठा आहे, हे स्पष्ट झाले आहे. अवैध व ओव्हरलोडिंग रेती वाहतूक तात्काळ थांबवावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू केसराळीकर यांनी दिला आहे.

COMMENTS