बीड : वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) बसवण्यात येत असलेल्या नवीन डिजिटल वीज मीटरमुळे बिलात भरमसाठ वाढ होत असल्याचा गंभीर आरोप बीडमधील नागरिकांनी क

बीड : वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) बसवण्यात येत असलेल्या नवीन डिजिटल वीज मीटरमुळे बिलात भरमसाठ वाढ होत असल्याचा गंभीर आरोप बीडमधील नागरिकांनी केला आहे. पूर्वी ज्या ग्राहकांना महिन्याला सुमारे १,००० रुपये वीज बिल येत होते, त्यांना आता थेट १,५०० ते १,६०० रुपये, तर काही प्रकरणांत थेट दुप्पट बिल आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
नवीन मीटर बसवल्यानंतर बिलात अचानक झालेल्या या वाढीमुळे महावितरणचा कारभार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. महावितरण आपली वीज गळती आणि वीज चोरीचा आर्थिक भार प्रामाणिकपणे नियमित बिल भरणार्या सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारत आहे का, अशी शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे.
याशिवाय, वीज वितरण कंपनीकडून ठेकेदारांच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे. नवीन बसवले जाणारे ट्रान्सफॉर्मर आणि इतर तांत्रिक साहित्याचा दर्जा जुन्या साहित्याच्या तुलनेत अत्यंत निकृष्ट असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या तक्रारींनंतरही अधिकार्यांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बिलात झालेली ही वाढ तांत्रिक बिघाडामुळे आहे की ग्राहकांची लूट सुरू आहे, याबाबत महावितरणने तातडीने अधिकृत खुलासा करून चौकशी करावी, अशी मागणी बीडमधील वीज ग्राहकांकडून केली जात आहे.

COMMENTS