नांदेड : शहरात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये दररोज निर्माण होणारी कोंडी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी

नांदेड : शहरात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून, प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये दररोज निर्माण होणारी कोंडी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनधारकांकडून सिग्नलचे सर्रास उल्लंघन केले जात असताना, ही बेशिस्त रोखण्याची जबाबदारी असलेली वाहतूक शाखा मात्र कमालीची निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील शिवाजीनगर, वजीराबाद, आयटीआय कॉर्नर, गुरुद्वारा परिसर, छत्रपती चौक, वर्कशॉप कॉर्नर, तरोडा नाका, सुधाकर नाईक चौक, अण्णाभाऊ साठे चौक, भाग्यनगर तसेच रेल्वे स्टेशन रोड या भागांमध्ये सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अपुरे नियोजन यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः फुले मार्केट ते गणेशनगर मार्गावर दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून, अनेक वेळा रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे अवघड होत आहे.
काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्याऐवजी पोलीस कर्मचारी अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे, वजीराबाद चौकात अत्याधुनिक सिग्नल आणि तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित असली, तरी शहरातील इतर भागांतील मूलभूत वाहतूक व्यवस्थाही सक्षम करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने ठोस उपाययोजना करून वाहतूक शाखेची कार्यपद्धती सुधारावी, अशी मागणी नांदेडकरांकडून केली जात आहे.

COMMENTS