नांदेड : नांदेड शहरात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सलग खून, टोळीयुद्ध आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आधीच ऐरणीवर
नांदेड : नांदेड शहरात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सलग खून, टोळीयुद्ध आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आधीच ऐरणीवर आला होता. आता शहरापुरती मर्यादित मानली जाणारी ही गुंडगिरी आणि गँगवारचे सावट ग्रामीण भागातही पोहोचल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुरुवारी अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या खुनाच्या भीषण घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य वाद, क्षुल्लक कारणे, आर्थिक व्यवहार किंवा जुन्या वैमनस्यातून थेट जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असल्याने सामाजिक संतुलन बिघडत चालले आहे. शहरात झालेल्या टोळी संघर्षाच्या घटनांनंतर आता ग्रामीण भागातही गुन्हेगारीचे स्वरूप अधिक व्यापक आणि हिंसक होत असल्याचे चित्र आहे. गावागावांमध्ये वाढणारी दहशत, तरुणांमधील आक्रमकता, सोशल मीडियाचा गैरवापर आणि किरकोळ कारणांवरून होणारे जीवघेणे हल्ले यांमुळे समाजमन कमालीचे अस्वस्थ झाले आहे.
पूर्वी गावपातळीवर ज्येष्ठांच्या मध्यस्थीने मिटणारे वाद आता थेट हिंसक संघर्षात बदलत आहेत. सलग घडणाऱ्या या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमधील सुरक्षिततेची भावना कमी होत चालली आहे. या वाढत्या गुंडगिरीवर कठोर नियंत्रण मिळवणे, अवैध शस्त्रांवर मोठी कारवाई करणे आणि संवेदनशील ग्रामीण भागांत पोलिसांचा गस्त व बंदोबस्त वाढवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा, शहरातून गावागावांत पोहोचलेले हे गुंडगिरीचे लोण भविष्यात अधिक गंभीर आव्हान ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

COMMENTS