Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेत कर्मचार्‍यांची 20 टक्के बोनसची मागणी

मुंबई : दिवाळी जवळ येऊ लागली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये सानुग्रह अनुदान अर्थात बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघट

उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
पावसाळ्यातील पूरस्थितीच्या आव्हानासाठी सज्ज रहावे; पालिका आयुक्तांचे निर्देश
अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी करणार खंडित

मुंबई : दिवाळी जवळ येऊ लागली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये सानुग्रह अनुदान अर्थात बोनसचे वारे वाहू लागले आहेत. पालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने बोनसच्या मागणीसाठी महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली.
पालिका कर्मचार्‍यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या 20 टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. दिवाळीला आता जेमतेम एक महिना उरला असून पालिकेच्या लाखभर कर्मचार्‍यांचे लक्ष दिवाळी बोनसकडे लागले आहे. कर्मचार्‍यांना खूष करण्यासाठी कामगार संघटनाही कामाला लागल्या आहेत. कर्मचार्‍यांना जास्तीत जास्त बोनस मिळावा म्हणून कामगार संघटना कामाला लागल्या आहेत. समन्वय समितीच्या सदस्यांनी मंगळवारी इक्बल सिंह चहल यांना निवेदन देऊन बोनसची मागणी केली. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, दिवाकर दळवी, वामन कविस्कर, अशोक जाधव, संजीवन पवार, शे. मो. राठोड, के. आर. सिंह उपस्थित होते. महापालिकेतील कामगार, कार्यालयीन कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, परिचारिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलातील जवान या कायम कर्मचार्‍यांबरोबरच विविध खात्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांनाही बोनस द्यावा, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. तसेच बोनसच्या रकमेतून आयकर व अन्य कर परस्पर कापून घेतले जातात. त्यामुळे कर्मचार्‍यांना पूर्ण बोनस मिळत नाही. परिणामी, बोनसच्या रकमेतून आयकर कापू नये किंवा अनिवार्य असल्यास पुढील पगारातून कापून घ्यावा, अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे. पालिकेचे सुमारे लाखभर कर्मचारी असून गेल्यावर्षी पालिकेच्या कर्मचार्‍यांना 22,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर 200 कोटी रुपयांहून अधिकचा भार आला होता.

COMMENTS