मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) रविवारी विक्रोळी शाफ्टमधून वांद्रे कुर्ला
मुंबई : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) रविवारी विक्रोळी शाफ्टमधून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील बांधकामाधीन मुंबई स्टेशनकडे बोगदा खोदण्याचे काम सुरू केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचे औपचारिक उद्घाटन करायचे होते, मात्र प्रतिकूल हवामान आणि रेड अलर्ट लक्षात घेऊन हा कार्यक्रम काल रात्रीच रद्द करण्यात आला, तरीही मशीनने आज नेहमीप्रमाणे काम सुरू केले.
राष्ट्रीय उच्चगती रेल्वे महामंडळाच्या माहितीनुसार, या प्रकल्पातील एकूण 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी मुंबईतील घणसोली परिसरापासून वांद्रे-कुर्ला विभागापर्यंतचा सुमारे 16 किलोमीटरचा भाग विशेष यांत्रिक प्रणालीद्वारे तयार करण्यात येणार आहे. उर्वरित 5 किलोमीटरचे काम आधुनिक ऑस्ट्रियन पद्धतीच्या साहाय्याने यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
विक्रोळी येथून कार्यरत झालेले हे यंत्र सुमारे 6 किलोमीटर लांबीचा एकाच नलिकेचा बोगदा तयार करणार असून, त्यातून दोन्ही दिशांनी धावणार्या वेगवान रेल्वे मार्गांची व्यवस्था करण्यात येणार आहे. हा बोगदा अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसरातून जाणार असून त्यामध्ये उंच इमारती, प्रमुख रस्ते, मिठी नदी तसेच विविध नागरी पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. त्यामुळे हे काम अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक मानले जात आहे. सध्या वापरात असलेले हे विशाल यंत्र भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बोगदा खोदकाम यंत्रांपैकी एक मानले जाते. त्याचा व्यास सुमारे 13.6 मीटर असून तो चार मजली इमारतीच्या उंचीइतका आहे. या यंत्राचे वजन सुमारे 3,100 टन असून ते अंदाजे 96 मीटर लांब आहे. त्यामध्ये मुख्य कापणी यंत्रणा, आधार व्यवस्था, दगडांचे तुकडे करणारी यंत्रणा, बोगद्याचे अस्तर बसविण्याची साधने आणि विशेष वाहतूक विभाग अशा अनेक आधुनिक घटकांचा समावेश आहे. या यंत्रातील प्रमुख चक्र दर मिनिटाला चार फेर्या घेत खोदकाम करते. मिश्र प्रकारच्या भूभागात तसेच जास्त भूजल दाब असलेल्या ठिकाणी सुरक्षितपणे बोगदे निर्माण करण्यासाठी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. खोदकामादरम्यान विशेष प्रकारच्या दाबयुक्त माती-द्रावणाच्या साहाय्याने बोगद्याचा पुढील भाग स्थिर ठेवला जातो, ज्यामुळे जमिनीची घसरण किंवा इतर धोके कमी होतात. तज्ज्ञांच्या मते, मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरात भूमिगत पायाभूत सुविधा उभारताना अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरतो. त्यामुळे केवळ प्रकल्पाची गती वाढणार नाही, तर सुरक्षितता आणि गुणवत्तेचीही हमी मिळणार आहे.

COMMENTS