मुंबई : राज्यात अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले महाविकास आघाडीचे सरकारने पर्यावरणाचा र्हास होण्याच्या भीतीमुळे आरेमधील मेट्रो कारशेडवर बंदी घालत प
मुंबई : राज्यात अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलेले महाविकास आघाडीचे सरकारने पर्यावरणाचा र्हास होण्याच्या भीतीमुळे आरेमधील मेट्रो कारशेडवर बंदी घालत पर्यायी मार्ग म्हणून कांजुरमार्गे येथे मेट्रो कारशेड होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यात अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवर घातलेली बंदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठविली. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-3चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे 25 टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर 2019मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे. ठाकरे यांनी आरेमधील तर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, राज्यात सत्तांतर होताच शिंदे आणि फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मुंबईकरांनी व अनेक पर्यावरणप्रेमींनी आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कारशेड उभारण्याला विरोध केला होता. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम चालू केले होते. मात्र ठाकरे सरकारने आरेतील मेट्रोच्या कारशेडचे कामाला स्थिगिती दिली होती. पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सत्तेवर येताच हा निर्णय बदलला असून, आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवली आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच यावर विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.
आरे-कारशेडचा मुद्दा तापण्याची चिन्हे
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचे सुत्रे हाती घेताच मेट्रोचे कारशेड आरेतच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पाची धुरा पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वीच या कारशेडचे काही काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता नवीन वाद निर्माण होऊन तो चिघळण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल. मात्र, आता यावर शिवसेना कितपत आक्रमक भूमिका घेऊ शकते, हे पाहावे लागले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.
COMMENTS