मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेस परळीपर्यंत वाढवण्याची मागणी परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे टर्मिनसच्या विकासासह रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपास

मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेस परळीपर्यंत वाढवण्याची मागणी
परळी वैजनाथ : परळी वैजनाथ रेल्वे टर्मिनसच्या विकासासह रेल्वे प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग (बाप्पा) सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून परळी रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची आग्रही मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांच्यामार्फत हे सविस्तर निवेदन सादर केले. परळी वैजनाथ हे मराठवाड्यातील महत्त्वाचे धार्मिक, व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र असून येथे दरवर्षी लाखो भाविकांची ये-जा असते. मात्र, रेल्वे सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ८ जून रोजी परळी येथे प्रवाशांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते, ज्याची दखल खासदार सोनवणे यांनी घेतली आहे.
निवेदनात प्रामुख्याने मछलीपट्टनम-बिदर एक्सप्रेस (क्र. १२७४९/१२७५०) या रेल्वेगाडीचा परळी वैजनाथपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. २०२० पासून प्रलंबित असलेल्या या मागणीमुळे हैदराबाद, बिदर, लातूर रोड आणि परळी थेट जोडले जातील. तसेच आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परळी मार्गे विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्याची आणि रेल्वे गाड्यांची देखभाल व स्वच्छतेसाठी परळीत ‘पिट लाईन’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात अॅड. जीवनराव देशमुख, नितीन बागवाले, नगरसेवक कादर कुरेशी, बदर भाई, श्रीनिवास राऊत, सद्दाम शेख आदी नेते व रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS