नवी दिल्ली : ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक १४ आणि १५ मे रोजी भारतात होणार असून, या बैठकीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री स

नवी दिल्ली : ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक १४ आणि १५ मे रोजी भारतात होणार असून, या बैठकीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची भारतात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, सुरू असलेले संघर्ष आणि शांततेसाठीचे प्रयत्न या विषयांवर या बैठकीत प्रमुख चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
इराणने भारताला कळवल्यानुसार, अरागची यांचा भारत दौरा सध्या नियोजित कार्यक्रमात समाविष्ट आहे. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यातील नाजूक युद्धविराम टिकून राहतो की नाही, यावर त्यांच्या दौऱ्याचे भविष्य अवलंबून असल्याचे मानले जात आहे. सध्या तेहरान प्रशासन अमेरिकेने सुचवलेल्या १४ कलमी शांतता प्रस्तावाचा अभ्यास करत आहे. या प्रस्तावानुसार, इराणने पुढील १२ वर्षांसाठी युरेनियम संवर्धन कार्यक्रम स्थगित ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
२०२४ मध्ये इराणचा ब्रिक्स समूहात समावेश झाल्यानंतर या गटात इराणचे महत्त्व वाढले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान आणि परराष्ट्र मंत्री अरागची यांनी पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलच्या भूमिकेविरोधात भारताने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या दौऱ्यात द्विपक्षीय प्रश्नांवरही चर्चा होण्याची शक्यता असून, विशेषतः द्रवरूप स्वयंपाक वायू (LPG) पुरवठा आणि होर्मूझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याची खात्री दिली आहे. मात्र, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या उपस्थितीबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

COMMENTS