मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली जाण्याची चिन्हे आहेत. शेतकर्यांच्या उत्पन्नकरासंदर्भातील माहिती केंद्र सरकारकडून मागविण्यात आली असून, ती प्राप्त झाल्यानंतरच लाभार्थ्यांची अंतिम छाननी करून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हजारो शेतकर्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून, या विलंबामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राकडून आवश्यक माहिती मिळण्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील आठवड्यातही कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू होईल की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. या योजनेत उत्पन्नकर भरणार्या शेतकर्यांचा समावेश करायचा की त्यांना लाभापासून वगळायचे, याबाबत सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जर अशा शेतकर्यांना योजनेतून वगळण्यात आले, तर मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध शेतकरी संघटना सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून, राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढण्याचीही चिन्हे आहेत. यापूर्वी महिलांसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनेच्या अंमलबजावणीवेळीही केंद्राकडून आवश्यक माहिती मिळण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागल्याचा अनुभव आहे. त्यामुळे याही वेळी माहिती मिळण्यास विलंब झाल्यास कर्जमाफीची प्रक्रिया आणखी लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS