बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारा अधिकारीच तब्ब

बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारा अधिकारीच तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई अशा वेळी झाली, जेव्हा संबंधित अधिकारी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होता.सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड याच्यावर सरकारकडून मिळालेल्या वृक्षलागवड निधीचे वितरण आणि एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ मंजूर करण्यासाठी 12 टक्के कमिशन, म्हणजेच 45 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बीड जिल्ह्याला वृक्षलागवडीसाठी सुमारे 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी वितरित करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्याची वेतनवाढ मंजूर करण्याच्या बदल्यात श्रीनिवास लखमावाड यांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती.तक्रारदाराने सुरुवातीला लाच देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सूडबुद्धीने त्याची वेतनवाढ रोखण्यात आली आणि निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचला. लखमावाड यांनी तक्रारदाराला आपल्या घरी बोलावलं. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर चेहऱ्यावरून रुमाल फिरवून संकेत दिला आणि बाहेर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ धाड टाकत 45 लाख रुपयांच्या रोख रकमेसह श्रीनिवास लखमावाड यांना रंगेहात अटक केली.ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने केली.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, श्रीनिवास लखमावाड हे 2016 च्या MPSC परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. एकेकाळी गुणवत्तेचं प्रतीक मानला गेलेला अधिकारी आज लाचखोरीच्या आरोपात अटकेत असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याआधीही अशा प्रकारे कमिशन घेतलं गेलं होतं का? आणि या प्रकरणाचे आणखी धागेदोरे समोर येणार का? याचा तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे.या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलं असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS