Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किर्गिझस्तानमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आ. तांबेंचा पुढाकार

विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांना पत्राद्वारे केली विनंती

अहमदनगर ः किर्गिझस्तानमध्ये पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांवर होणार्‍या वांशिक हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर आता आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार
कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा
एसएसजीएम महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात  

अहमदनगर ः किर्गिझस्तानमध्ये पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांवर होणार्‍या वांशिक हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर आता आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी थेट परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवले आहे. या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातील असून त्यांच्यासह सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच किर्गिझस्तानच्या सरकारशी बोलून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल का, याचीही चाचपणी करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानी आणि भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं गेलं. त्यानंतर या देशात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या 10 हजारांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे विद्यार्थी हॉस्टेलच्या बाहेर पडण्यासही घाबरत आहेत. तर अनेकांनी देश सोडून जाण्यासाठी थेट विमानतळ गाठलं आहे. या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांमधील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. किर्गिझस्तानमध्ये अडकून पडलेल्या आणि हल्ल्याच्या भीतीने गर्भगळीत झालेल्या या विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. हे विद्यार्थी उज्ज्वल भविष्याची आशा घेऊन तिथे गेले आहेत. मात्र आता ते अडकून पडले असतील, तर त्यांना सुखरूप भारतात आणायला हवं. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांच्या परतीची व्यवस्था करावी, अशी मागणी मी पत्राद्वारे केली आहे, असं आ. सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले. आपल्या विद्यार्थी चळवळीच्या काळापासूनच विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी पुढाकार घेणार्‍या आ. तांबे यांनी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, या बाबीकडेही जयशंकर यांचं लक्ष पत्राद्वारे वेधलं आहे. जोपर्यंत किर्गिझस्तानमधील परिस्थिती पूर्ववत आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित होत नाही, तोपर्यंत तेथील विद्यापीठांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने घ्यावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. यासाठीही परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न करावे, अशी मागणीही आ. तांबे यांनी केली आहे.

हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य! – किर्गिझस्तानमध्ये शिकणारे हे विद्यार्थी हुशार आहेत. देशाचं भविष्य घडवण्याची ताकद त्यांच्या मनगटांत आहे. आत्ता ते अडचणीत आहेत आणि त्यांना परत मायभूमीत आणणं, हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी माझ्या परीने जे करता येईल, ते सगळं मी करेन. परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून मी त्यांना परत आणण्याची मागणी केली आहे. तसंच त्यांचं काही शैक्षणिक नुकसान झालं, तर ते कसं भरून काढता येईल, यासाठीच्या आराखड्याबाबतही आम्ही विचार करत आहोत. – आ. सत्यजीत तांबे.

COMMENTS