रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवक समुद्रात वाहून गेल्याच

रत्नागिरी : जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर शनिवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच युवक समुद्रात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात हळहळ व्यक्त होत असून वातावरण शोकमय झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून 19 जणांचा मित्रपरिवार गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. सकाळी श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर काही युवक समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी आणि पाण्यात उतरण्यासाठी गेले. मात्र, समुद्रातील वाढत्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही युवक खोल पाण्याकडे ओढले गेले. घटना लक्षात येताच त्यांच्या सहकार्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. तत्काळ स्थानिक प्रशासन आणि बचाव यंत्रणांना माहिती देण्यात आली. बचाव पथकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. या प्रयत्नांत तिघा युवकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून पाच युवकांचा शोध अद्याप सुरू आहे. बुडाल्यामध्ये आदित्य संतोष राऊत (22), अनिकेत बंडू हिवराळे (20), आनंद राजू नरवडे (20), प्रेमदीप आदमाने (19), यश दामोदर कांबळे (20) या तरूणांचा समावेश आहेत. हे सर्व युवक बिडकीन परिसरातील रहिवासी असून पर्यटनासाठी मित्रांसह कोकण दौर्यावर गेले होते.

COMMENTS