Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!

लातूर प्रतिनिधी - शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा तालुक्यांतील एकूण 56 केंद्रांवर रविवारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा

14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
भाऊजीने केला मेहुण्याचा खून
पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे

लातूर प्रतिनिधी – शहरासह जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा तालुक्यांतील एकूण 56 केंद्रांवर रविवारी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा (नीट) घेण्यात आली. दरम्यान, या परीक्षेला तब्बल 25 हजार 600 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख मार्गांवर वाहनांची तोबा गर्दी झाली होती. परिणामी, या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत पालक-विद्यार्थी कसेबसे परीक्षा केंद्रावर पोहोचले. ‘नीट’च्या परीक्षेला वाहतूक मात्र वेडीवाकडी असल्याने पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागाला.
नीट परीक्षेसाठी लातुरात जवळपास 50 केंद्रांची स्थापना करण्यात आली होती; तर उर्वरित सहा केंद्रे ही जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा तालुक्यांत होती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी लातुरात आले आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात आला. मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी बहुतांश पालकांनी चारचाकी वाहनांचा वापर केल्याने वाहतुकीचा एकच खोळंबा झाला. पोलिसांना वाहतुकीला शिस्त लावताना मोठी कसरत करावी लागली. रविवारी लातूर शहरात धर्मादाय विभागाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी राज्याचे तत्कालीन धर्मादाय आयुक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे याच वाहतूक कोंडीदरम्यान लातुरात होते. नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने तासभर उशीर होईल, हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी न्यायमूर्ती डिगे दुचाकीवरूनच समारंभस्थळी पोहोचले. कित्येक विद्यार्थी, पालकही चारचाकी वाहन सोडून रस्त्यावर चालत होते; तर न्यायमूर्तींनाही दुचाकीवरूनच जावे लागले लातूर शहरातील परीक्षा केंद्राबाहेर पालक आणि वाहनांची एकच गर्दी दिसून आली. यातून मार्ग काढणेही महाकठीण झाले होते. अनेक वाहने परीक्षा केंद्राकडे येत होती; तर काही वाहने परीक्षा केंद्रावरून परत फिरत होती. वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीचा एकाच गोंधळ उडाला. दयानंद गेट परिसरात जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. लातूर शहरात दाखल होण्यासाठी नांदेड नाका ते राजीव गांधी चौक रिंग रोडचा काहींनी वापर केला. मात्र, शहरात औसा मार्गावरून दाखल होणारी आणि नांदेड रोड रिंग रोडने येणार्‍या वाहनांचा राजीव गांधी चौकात एकच गोंधळ उडाला. येथे जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चारही मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळ आणि सायंकाळचे चित्र सारखेच होते. प्रत्येकजण आपले वाहन मध्येच घुसवत असल्याने वाहतूक ठप्प झाली. याचा पालक-विद्यार्थ्यांनाच मोठ्या प्रमाणावर त्रास्त सहन करावा लागाला. चौकातील या वाहतूक कोंडीने पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

COMMENTS