Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटेचा शपथविधी सरकार बदलण्यासाठी  

शरद पवारांचा गौप्यस्फोट ः शपथविधीची माहिती असल्याची अप्रत्यक्ष कबुली

मुंबई/प्रतिनिधी ः तब्बल तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पहाटेचा शपथविधी घडला होता. मात्र त्यानंतर या भूकंपा

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने विनम्र अभिवादन
जलसंधारणाची सहा हजार कोटींची कामे रद्द
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान

मुंबई/प्रतिनिधी ः तब्बल तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पहाटेचा शपथविधी घडला होता. मात्र त्यानंतर या भूकंपावर ना राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केले, ना अजित पवारांनी, ना देवेंद्र फडणवीसांनी. मात्र आत्ता काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी शरद पवारांशी चर्चा करूनच शपथविधी केल्याचे सांगितले होते. त्यानंतर बुधवारी शरद पवारांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य कर पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठल्याचे वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे पवारांना पहाटेच्या शपथविधी माहिती होती, अशी अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली आहे.

पहाटेच्या शपथविधी प्रकरणी अजित पवारांनी बोलण्याची काय गरज आहे?, तो केवळ सरकार बदलायचा प्रयत्न झाला. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. एक प्रकारे पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबुल केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शरद पवारांना माहिती आहे असे वक्तव्य केले होते. शरद पवार म्हणाले की, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलण्याची काय गरज आहे. समजने वाले को इशारा काफी है, म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती असल्याचे मान्य केल आहे. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांनी याआधी म्हटले होते की, मला वाटले देवेंद्र हा सुसंस्कृत, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते असे स्टेटमेंट करतील, असे मला कधी वाटले नव्हते. यानंतर त्यांनी आज अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सर्वांना धक्का देत 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र शरद पवारांनी लगेच सूत्रे हलवल्यामुळे हे सरकार 72 तासांत कोसळले. पण शपथविधीचा चमत्कार कसा घडला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

अनेक बाबी अजूनही गुलदस्त्यात – उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यासंदर्भातील काही माहिती उघड केली असली तरी, अजूनही यासंदर्भातील बरीच माहिती गुलदस्त्यात आहे. शरद पवारांनी अप्रत्यक्ष कबुली दिली असली तरी, त्यांनी यासंदर्भातील पूर्ण माहिती दिलेली नाही. शिवाय अजित पवार यासंदर्भातील कोणतेही भाष्य करायला तयार नाही. फडणवीसांनी यासंदर्भात बोलतांना म्हणाले होते की, ‘ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करूनच सारे ठरले होते. पण नंतर या गोष्टी बदलल्या,’ असे फडणवीस म्हणाले होते. शरद पवारांनी मात्र त्याचे खंडन केले होते. त्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा काही पत्ते उघड केल्यानंतर हा सगळा घटनाक्रम कधी समोर येईल असा सवाल उपस्थित होत आहे.

आता पुढील गोष्टींचाही खुलासा करावा ः उपमुख्यमंत्री फडणवीस – शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ’बरे झाले आता त्यांनी स्वत:च याबद्दल खुलासा केला’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ’आता एवढे बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली? त्यामागे कोण होते? कोणाच्या सांगण्यावरून लागली आणि त्याच नेमकं कारण काय? अश्या सगळ्या गोष्टींचाही ते खुलासा करतील ही माझी अपेक्षा आहे, अशी गुगली देखील फडणवीस यांनी टाकली आहे. या सगळ्या कड्या जोडल्या तर सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट होतील, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS