Homeताज्या बातम्या

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात; राज्यात १ कोटी ७७ लाख महिला पात्र

मुंबई : राज्य शासनाच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी

अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवी गती; उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नका, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदामराव पंडितांची तंबी
मातोश्रीवरील महत्त्वाच्या बैठकीपूर्वी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ‘नॉट रिचेबल’; ठाकरे गटात खळबळ
लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा; e-KYC करताना केलेली चूक येणार सुधारता, आता  अंगणवाडी सेविका थेट… | Navarashtra

मुंबई : राज्य शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून, १५ जूनच्या सायंकाळपासून टप्प्याटप्प्याने हा निधी वितरित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचे अनुदान एकत्रित स्वरूपात वितरित केले होते. आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीद्वारे मे महिन्याचा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. या हप्त्याच्या वितरणासाठी १० जून रोजी महिला व बालविकास विभागाकडे ३४४ कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

७० लाख अर्ज अपात्र; ही आहेत कारणे: शासनाच्या आकडेवारीनुसार, या योजनेसाठी राज्यभरातून सुमारे अडीच कोटी महिलांनी अर्ज सादर केले होते. गेल्या दीड वर्षांपासून अर्जांची सखोल छाननी आणि पडताळणी करण्यात आली. ३० एप्रिलपर्यंतची अंतिम यादी तयार करण्यात आली असून राज्यातील सुमारे १ कोटी ७७ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, विविध कारणांमुळे सुमारे ७० लाख अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्रतेच्या निकषांची पूर्तता न करणे, आवश्यक कागदपत्रांमधील त्रुटी तसेच तांत्रिक अडचणी यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

अर्ज पडताळणीदरम्यान प्रशासनाने उत्पन्न, कुटुंबाची माहिती, इतर शासकीय योजनांचा लाभ आणि रहिवासी पुरावे यांची तपासणी केली. त्यामध्ये काही महिलांचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. याशिवाय ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण ना करणे, अपूर्ण कागदपत्रे, दुबार अर्ज, चुकीची माहिती तसेच ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींमुळे अनेक अर्ज बाद झाले. बँक खात्याशी आधार जोडणी (Aadhar Link) नसणे किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलल्यानेही अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला.

मेसेज आला नसेल तर काळजी करू नका! मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी काही लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश (SMS) अद्याप प्राप्त झालेला नाही. तांत्रिक कारणे किंवा बँकिंग यंत्रणेवरील ताणामुळे संदेश मिळण्यास विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांनी चिंता न करता आपल्या बँकेचे विवरणपत्र (Statement) तपासावे किंवा जवळच्या शाखेत जाऊन पासबुक अद्ययावत (Update) करून घ्यावे, जेणेकरून रक्कम जमा झाल्याची खात्री करता येईल.

COMMENTS