बीड : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेल

बीड : राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सरसकट कर्जमाफी नसून जाचक अटी व शर्तींच्या जंजाळात अडकलेली योजना असुन या योजनेतील त्रुटी दूर करून सर्व पात्र व अपात्र शेतकर्यांना समान न्याय देत सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.12 शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर वाटप करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या सद्यस्थितीतील कर्जमाफी योजनेत अनेक अटी व निकष घालण्यात आले असून त्यामुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनेक गरजू व कर्जबाजारी शेतकरी केवळ तांत्रिक कारणांमुळे किंवा अटींची पूर्तता न झाल्यामुळे कर्जमाफीपासून दूर राहणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी नमूद केले. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी उपस्थितांना गाजर वाटप केले. देवाभाऊंची कर्जमाफी योजना म्हणजे शेतकर्यांना दाखविलेले गाजर आहे. प्रत्यक्ष लाभापासून अनेक शेतकरी वंचित राहणार असतील तर ही योजना शेतकरी हिताची कशी म्हणता येईल? असा सवाल डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आणि जाचक अटींमुळे अपात्र ठरणारे शेतकरी यांच्यामध्ये विषमतेची भावना वाढीस लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला तात्पुरत्या दिलास्याऐवजी कायमस्वरूपी कर्जमुक्तीची गरज आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करून सर्व शेतकर्यांचे सातबारा कोरे करावेत, अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात रामनाथ खोड,शेख युनुस, बाळासाहेब मोरे पाटील, माजी सैनिक अशोक येडे, राजेंद्र आमटे,सय्यद सादेक, माऊली शिंदे,,रामधन जमाले, हनुमान घोडके,भिमराव कुटे, प्रा.पंडीत तुपे, अँड.संग्राम तुपे ,आनंदराव येडे,प्रविण आनेराव अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती हवी, सातबारा कोरा करा, शेतकरी वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

COMMENTS