श्रीगोंदा : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या चालुक्य वंशजांनी एकत्र येऊन सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक एकात्मतेसाठी कार्य केले पाहिजे, अ

श्रीगोंदा : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या चालुक्य वंशजांनी एकत्र येऊन सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक एकात्मतेसाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन चालुक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा चालुक्य घराण्याचे वंशज दीपक साळुंखे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नाव्ही, भोगंवली, भांबरडे व पांडे येथे आयोजित राज्यस्तरीय सोनवणे परिवार स्नेह मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बोलताना साळुंखे यांनी स्वराज्य काळातील सोनवणे घराण्याच्या योगदानाचा गौरवपूर्ण इतिहास उपस्थितांसमोर मांडला. समाजातील विविध शाखांमध्ये विखुरलेल्या चालुक्य वंशीयांनी आपला इतिहास, परंपरा आणि सामाजिक वारसा जतन करण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मेळाव्यात प्रा. दिनेश सोनवणे यांनी सांगितले की, सोनवणे परिवार हा चालुक्य वंशीय असून चालुक्य साम्राज्याच्या काळात नाव्ही-भोगंवली परिसर उपराजधानी म्हणून ओळखला जात होता.
प्रा. विलास सोनवणे यांनी सर्वांना आपल्या घराण्याची माहिती, कागदपत्रे व इतिहास एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, जेणेकरून सविस्तर इतिहास लेखन करणे शक्य होईल. दरम्यान, पुढील राज्यस्तरीय भव्य सोनवणे परिवार मेळावा सन २०२७ मध्ये शिरूर तालुक्यातील निर्वी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या मेळाव्यास राज्यभरातून सोनवणे परिवार व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS