नांदेड : नांदेड शहरातील विविध हॉटेल, उपहारगृहे, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवाव

नांदेड : नांदेड शहरातील विविध हॉटेल, उपहारगृहे, ढाबे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. हॉटेलमधील किचनची स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, कच्च्या मालाची साठवण, वापरले जाणारे खाद्यतेल, पनीर तसेच इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही हॉटेलमध्ये कालबाह्य अथवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी बुरशी आलेले खाद्यपदार्थ किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेला कच्चा माल वापरला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा पदार्थांच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, तळलेल्या पदार्थांसाठी एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. तज्ज्ञांच्या मते, वारंवार गरम केलेले खाद्यतेल आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अलीकडेच शालेय पोषण आहाराच्या तपासणीत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात अन्नसाठा जप्त केला होता. त्याच धर्तीवर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, स्वीट मार्ट आणि फास्टफूड केंद्रांचीही अचानक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, किचनमधील स्वच्छतेची पाहणी करणे, कालबाह्य साहित्य, निकृष्ट दर्जाचे पनीर, मसाले व खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणे आणि नियमांचे उल्लंघन करणार्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने नियमित आणि प्रभावी तपासणी मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

COMMENTS