मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीव
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटनांची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत राज्यातील आपत्ती व्यवस्थापन, नागरी प्रशासन आणि पूर्वतयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, असे त्यांनी नमूद केले. वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाडे कोसळणे तसेच मानखुर्द येथील निवासी इमारत कोसळण्यासारख्या दुर्दैवी घटनांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बारा नागरिकांचा जीव गेल्याची बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची तपासणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी, उघड्या मॅनहोलची सुरक्षित व्यवस्था, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जलनिस्सारण यंत्रणेची देखभाल आणि आपत्कालीन यंत्रणांची पूर्वतयारी यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. मात्र प्रत्यक्षात या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या आणि अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ’मिसिंग लिंक’ परिसरात दरड कोसळल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला.
एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला : खा. सुळे
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांतील पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना, रस्ते व रेल्वे वाहतुकीतील अडथळे, तसेच मानखुर्द येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात आपत्कालीन स्थिती जाहीर करून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावाव्यात, एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाईज झाल्याची टीका त्यांनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या की, राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही सरकारची जबाबदारी आहे. अशा वेळी प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत जनतेला वस्तुस्थितीची माहिती द्यावी.

COMMENTS