Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिव भांगे यांचा छ. संभाजीनगरचा दौरा गोपनीय का ?

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या गैरकारभाराविषयी आणि बेहिशोबी

सचिव भांगे यांच्याकडून शासन निर्णयाला केराची टोपली
खा. लोखंडेंनी मानहानीचा दावा करून आपली स्वच्छ प्रतिमा का सिद्ध केली नाही ?
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आंबेडकरी जनता एकवटली
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या गैरकारभाराविषयी आणि बेहिशोबी संपत्तींचा सर्व वृत्तांत आम्ही पुराव्यानिशी जनतेसमोर मांडल्यानंतर सचिव भांगे चांगलेच धास्तावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांचे छत्रपती संभाजीनगरचे गोपनीय दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सचिव भांगे मुंबई विमानतळावरून थेट छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरण्याची सुविधा असतांना, ते रेल्वे प्रवासाला का प्राधान्य देत आहे? आणि त्यांचा दौरा गोपनीय का असतो ? यामागे संशय निर्माण होत असून, सचिव भांगे आपल्या संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी हा दौरा करत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सचिव भांगे 12 मे रोजी शुक्रवारी पहाटे देवगिरी एक्सप्रेसने छत्रपती संभाजीनगरला आले. यावेळी त्यांच्या या दौर्‍याची विभागातील कोणत्याही अधिकार्‍याला कल्पना नसतांना, ते नेमके कुठे गेले ? कशासाठी गेले?  याचा कोणताही थांगपत्ता विभागाला नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे एका सचिव दर्जाचा अधिकारी एकटा प्रवास करतो, तो कशासाठी? वास्तविक पाहता सचिव सुमंत भांगे मंत्रालयात चार खासगी सुरक्षारक्षक आणि दोन-तीन पोलिस आपल्या संरक्षणासाठी सोबत ठेवतात, मात्र रेल्वे प्रवासावेळी हेच सुरक्षा रक्षक, पोलिस कर्मचारी जातात कुठे ? मंत्रालयात सचिव भांगेंना कसली भीती वाटते, ज्यामुळे ते खासगी कंपनीचे सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी बाळगतात, आणि रेल्वे प्रवासात मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी कुणीही नसते. त्यामुळे सचिव भांगे यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारवर असतांना, रेल्वे प्रवासात एकटे कसे ? त्यांना काही झाले तर ? याची जबाबदारी राज्य सरकारवर येवू शकते, त्यामुळे राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे.

तसेच विमान प्रवासात तुमच्या सामानांसह तुम्ही रोखीने नेत असलेल्या पैश्यांची चौकशी या प्रवासात होते. मात्र रेल्वे प्रवासात अशी कोणतीही चौकशी होत नाही. त्यामुळे सचिव भांगे रेल्वे प्रवासाला प्राधान्य तर देत नसावेत ना? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणज सचिव भांगे यांच्या रेल्वे प्रवासाचे तिकीट तरी त्यांच्याच नावावर बुकींग असते का? की इतर कुणाच्या नावावर ते प्रवास करतात, या संपूर्ण बाबींची चौकशी मुख्य सचिवांनी करण्याची गरज आहे. ते सचिव असल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी त्यांना घेणेसाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण भांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील दौरा गोपनिय ठेवला. ते का आले? कोठे गेले? हे कोणसही माहिती नाही. राज्यपातळीवरील अधिकारी कुठे गेले का गेले याची माहिती सर्वांना माहिती असणे आवश्यक असताना ते नेहमी छत्रपती संभाजीनगरचा गोपनिय दौरा कशासाठी करतात. संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी येतात की आणखी कशासाठी? ते नेहमी मुख्यालय सोडताना मुख्यसचिवांची परवानगी घेतात का? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांसह संस्थाचालकांना आमचा पाठिंबा ः विजय घाटे – सामाजिक न्याय विभागाने बार्टीतील अनेक योजनांना कात्री लावत, मागासवर्गीय संस्थांचे प्रशिक्षण रोखल्यामुळे आंबेडकरी समाजातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होतांना दिसून येत आहे. याविरोधात दैनिक लोकमंथनने आवाज उठवला असून, त्यांच्या या लढ्याला आमचा पाठिंबा असून, गरज भासल्यास याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंबेडकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही रिपब्लिकन बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय घाटे यांनी दैनिक लोकमंथनजवळ बोलतांना दिली आहे.

अनेक संस्थाचालकांनी कैफियत मांडत केला पाठिंबा व्यक्त
गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक न्याय विभागाला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या वाळवीने हा विभाग पोखरला जात असून, यातून हजारो आंबेडकरी विद्यार्थ्यांचे भवितव्य नासवण्याचे काम होत असल्यामुळे दैनिक लोकमंथनने या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. या लढ्यात केवळ बार्टीच्या संबंधित प्रशिक्षण देणार्‍या मागासवर्गीय संस्थाचालकच नव्हे तर, इतरही अनेक संस्थाचालकांनी आम्हाला फोन करून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून, या विभागातील भ्रष्टाचाराची कैफियत मांडत, आपला पाठिंबा व्यक्त केला असून, ही लढाई अशीच पुढे सुरू ठेवून, आंबेडकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी यावेळी केली.

डिंगळे, अहिरे, देशमुखांची जहागिरी नव्हे?- सामाजिक न्याय विभाग म्हणजे आपली जहागिरी असून, या जहागिरीचे आपणच सरदार असल्याच्या थाटात या विभागातील सहसचिव दिनेश डिंगळे, अवर सचिव अनिल अहिरे आणि कक्ष अधिकारी प्रज्ञा देशमुख वावरत असल्याचे दिसून येत आहे. कारण या विभागातील हे तिघेही अधिकारी गेल्या 8-9 वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे या विभागात मागासवर्गीय संस्थाचालकांचा छळ करण्याचा प्रकार सुरू आहे. यातून आंबेडकरी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांची आतातरी या विभागातून उचलबांगडी होणार का, असा आमचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल आहे.

सचिव भांगेंना विधी व न्याय विभागाची चपराक – सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे हे अनुसूचित जाती, बौध्द व्यक्ती, संस्थांना न्याय मिळू नये म्हणून नेहमी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यातच अनुसूचित जातीच्या असलेल्या बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांची नियमबाह्य व अन्यायकारक बदली केली होती. त्या बदलीच्या विरुद्ध श्रीमती अस्वार मॅटमध्ये गेल्या होत्या. त्यांना तेथे न्याय मिळू नये म्हणून सचिव सुमंत भांगे व माजी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अ‍ॅड. मुन यांना 6 लाख रुपये देऊन विशेष वकील म्हणून नेमले. शासनाचे सरकारी वकील असताना जर विशेष वकील नेमावयाचा असेल तर त्यास शासनाच्या विधी व न्याय विभागाची परवानगी घ्यावी लागते. शासनाकडे अनेक सरकारी वकील असताना ऐवढी मोठी फीस देऊन विशेष सरकारी वकील नेमता येणार नाही असे सांगून विशेष वकील नेमण्याची परवानगी नाकारुन सचिव सुमंत भांगे व धम्मज्योती गजभिये यांना विधी व न्याय विभागाने चपराक दिली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांनी करण्याची गरज आहे. विधी व न्याय विभागाने परवानगी नाकारल्यामुळे अ‍ॅड. मुन यांची 6 लाख रुपयांची फीस आता सचिव सुमंत भांगेच्या व माजी महासंचालक गजभिये यांच्या पगारातून  वसूल करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कोण या सोनकवडे ? –सामाजिक न्याय विभागातील सोनकवडे या कोण? ज्यांच्यावर सचिव सुमंत भांगे यांची विशेष मर्जी असून, त्यांच्या नियुक्तीला अनेकांनी आक्षेप घेतला असतांना देखील, त्यांना विशेष चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे सौर ऊर्जा या योजनेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, तसेच लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा असूनही त्यांना विशेष पद देण्यामागचे गौडबंगाल काय ?

रिपब्लिकन सेनेचा असाही विराधाभास ? – रिपब्लिकन सेनेचे आशिष गाडे यांनी काही दिवसांपूर्वी बार्टीविरोधात आंबेडकरी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असता, या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता रिपब्लिकन सेनेला आता उपरती झाली असून, विद्यार्थ्यांना पाठींबा देण्याऐवजी कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली का? असा आमचा सवाल आहे.

COMMENTS