Homeदखल

भक्तीच्या नावाखाली समतेच्या संत चळवळीशी गद्दारी !

भक्तीचा महाकुंभ अशी जाहीरातबाजी करून भक्ति चळवळ जी मध्ययुगीन भारतात उभी राहिलेली संत चळवळ होती. त्या चळवळीशी वैचारिक आणि सांस्कृतिक गद्दारी करणाऱ्

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूकीतील चुरस !
संघर्ष, समन्वय आणि संयम!
संकुचितांनी व्यापकता स्वीकारावी !

भक्तीचा महाकुंभ अशी जाहीरातबाजी करून भक्ति चळवळ जी मध्ययुगीन भारतात उभी राहिलेली संत चळवळ होती. त्या चळवळीशी वैचारिक आणि सांस्कृतिक गद्दारी करणाऱ्या जाहिरातीत संतांची यादी पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ही मांडणी भक्ती चळवळीच्या मूळ तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे. संत परंपरेचा गौरव करण्याच्या नावाखाली काही निवडक व्यक्तींचा समावेश करून, तर काही मूलभूत संतांना जाणीवपूर्वक वगळून, इतिहास आणि विचारधारेचा विपर्यास केला जात आहे. ही केवळ चूक नसून सामाजिक आणि वैचारिक पातळीवर धोकादायक प्रवृत्ती आहे.
महाराष्ट्रातील संत चळवळ ही केवळ धार्मिक आंदोलन नव्हती; ती सामाजिक समतेची, विज्ञाननिष्ठ विचारांची आणि जातिभेदविरोधी क्रांती होती. संत चोखामेळा (चोखोबा), संत गोरोबा, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या संतांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि वर्णव्यवस्थेवर कठोर टीका केली. त्यांच्या अभंगांतून विवेक, समानता आणि मानवी मूल्ये यांचा पुरस्कार केला गेला.
परंतु या फोटोत संत चोखोबा, संत गोरोबा यांसारख्या संतांचा समावेशच नाही. ही केवळ चूक मानायची का? की दलित आणि श्रमिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांना दुय्यम स्थान देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे? संत चळवळीचा कणा असलेल्या या संतांना वगळणे म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रकार आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे संत चळवळीला मान्य नसलेल्या रामदास स्वामींचा समावेश. रामदास स्वामींची भूमिका वेगळी, त्यांचे तत्त्वज्ञान वेगळे. ते वारकरी संत परंपरेच्या समतावादी प्रवाहात बसत नाहीत. त्यांना संत चळवळीच्या यादीत आणणे म्हणजे दोन भिन्न परंपरांचे राजकीय हेतूने मिश्रण करण्याचा प्रयत्न आहे.
त्याचप्रमाणे काही तथाकथित चमत्कारिक बाबांचा समावेश करून भक्ती चळवळीच्या विज्ञाननिष्ठ परंपरेला धक्का देण्यात आला आहे. संत तुकारामांनी “विवेक” आणि “ज्ञान” यांचा पुरस्कार केला. संत एकनाथांनी सामाजिक सुधारणांचे धाडस दाखवले. पण चमत्कारांच्या गोष्टी, अंधश्रद्धा आणि चमत्कारिक कथनांनी भारलेली व्यक्तिमत्त्वे या परंपरेत कशी बसतात? भक्ती म्हणजे आंधळा विश्वास नव्हे; भक्ती म्हणजे अंतर्मुखता, नैतिकता आणि विवेक. याहूनही आश्चर्यकारक म्हणजे काही वर्षांपूर्वी लोकांना भोंदणारा म्हणून चर्चेत आलेल्या शिपाईची नोकरी करित वैद्य बनवून अनेकांना गंडवणारा बालाजी तांबे याचाही समावेश या यादीत करून भक्ती-शक्तीची परंपरा आयोजकांनी मोडीत काढली आहे. अशा व्यक्तींना संतांच्या रांगेत उभे करणे म्हणजे संतांच्या चळवळीशी बेईमान होणे होय. संतपद हे आयुष्यभराच्या तपश्चर्येने, समाजकार्याने आणि विचारक्रांतीने प्राप्त होते; ते लोकप्रियतेने किंवा बाजारपेठेतील प्रभावाने मिळत नाही.
या सगळ्या गोष्टींकडे पाहता आयोजकांच्या वैचारिक प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. संत परंपरेचा वापर करून लोकांना भावनिकरीत्या जोडणे आणि त्याच वेळी मूळ क्रांतिकारी विचार बाजूला सारणे—हा एक प्रकारचा सांस्कृतिक राजकारणाचा खेळ आहे. समाजाला पाचशे वर्षे मागे नेण्याचा हा प्रयत्न वेळीच थांबवला गेला पाहिजे.
संत चळवळ ही विवेकाची, समानतेची आणि मानवतेची चळवळ होती. ती कोणत्याही अंधश्रद्धेची किंवा व्यक्तिपूजेची नव्हती. आज जर आपण या परंपरेचा विपर्यास सहन केला, तर उद्या इतिहासच बदलून टाकला जाईल. त्यामुळे समाजातील सुजाण नागरिकांनी, अभ्यासकांनी आणि वारकरी बांधवांनी यावर आवाज उठवणे आवश्यक आहे.
भक्ती चळवळीचा वारसा जपायचा असेल, तर तिच्या मूळ मूल्यांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. अन्यथा संतांचे नाव घेऊन अंधश्रद्धा, भोंदूपणा आणि व्यक्तिपूजा वाढवण्याचा हा प्रकार थांबवण्यासाठी समाजाने ठाम भूमिका घेणे हाच एकमेव मार्ग उरतो.

COMMENTS