Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बा..विठ्ठला सर्वांना सुखी, समृद्ध कर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

पंढरपूर/प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा केली, यानंतर विठूरायाला साकडे घा

अतिवृष्टीग्रस्तांच्या भरपाई रकमेत दुपटीने वाढ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट 
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पंढरपूर/प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा केली, यानंतर विठूरायाला साकडे घालतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बा विठ्ठला बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे त्यांनी यावेळी घातले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.

महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकर्‍यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आषाढी वारीत लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनास आले आहेत. पंढरी व परिसर अवघा पांडुरंगमय झाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला ओढीने आलेल्या वारकर्‍यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकर्‍यांचे दर्शन जलद व सुलभ झाले. राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून 108 कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 73 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्‍वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, 30 खाटांचे रूपांतर 100 खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगरमधील काळे दांपत्य मानाचे वारकरी – मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब काळे (वय 56) मंगल काळे (वय 52) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य 25 वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. हा मोफत पास शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास प्रदान करण्यात आला.

वारकर्‍यांच्या आरोग्याला दिले प्राधान्य – आषाढी वारीत वारकर्‍यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करणे विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकर्‍यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

COMMENTS