धोक्याची घंटा

Homeताज्या बातम्याविशेष लेख

धोक्याची घंटा

काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील  ३७० वे कलम हटवून केंद्र सरकारने  काश्मीरचे त्रिभाजन केले त्या घटनेला आता २८ महिने झाले आहे. ३७० वे कलम हटवल्यान

जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतले त्रंबक राजाचे दर्शन   
जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
स्थिर सरकार, पण पक्ष अस्थिर

काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील  ३७० वे कलम हटवून केंद्र सरकारने  काश्मीरचे त्रिभाजन केले त्या घटनेला आता २८ महिने झाले आहे. ३७० वे कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी गेली २८ महिने काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याने मागील २८ महिन्यात  काश्मीरमध्ये बराच काळ शांतता होती. आता मात्र काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढायला सुरवात केली. सात दिवसांपूर्वी  दहशतवाद्यांनी बंदीपोरामध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात दोघा सैनिकांना वीरमरण आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अवंतिकापुरामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला हा हल्ला सुरक्षा रक्षकांनी परतवून लावला त्यात एक दहशतवादी ठार झाला. १३ डिसेंबर रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला वीस वर्ष पूर्ण झाली. ही वेळ साधून दहशतवाद्यांनी सशस्त्र पोलिसांच्या नवव्या बटालियनवर गोळीबार केला त्यात दोन पोलीस शहिद झाले तर १२ पोलीस जखमी झाले. मागील काही महिन्यात दहशतवाद्यांनी डोके वर काढले हेच यातून सिद्ध होते. दहशतवादी केवळ पोलीस किंवा जवानांनाच लक्ष करत नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करत आहेत. मागील महिन्यांत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील एका शाळेवर हल्ला करून शाळेतील दोन शिक्षकांना ठार मारले होते. गेल्या वर्षभरात १९ सुरक्षारक्षक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत तर काही नागरिकही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले आहेत. मागील २८ महिने शांत असलेले काश्मीर खोऱ्यात पुन्हा दहशतवाद्यांचा धुडगूस सुरू झाला असून काश्मीर खोरे अशांत करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न साकार होऊ लागले आहे. ही धोक्याची घंटा आहे.  या बदलाची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्वरित पावले उचलली पाहिजे. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यात हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद व लष्कर ए तोयबा या संघटना अग्रेसर आहेत. या संघटना पाक पुरस्कृत असून  या संघटनांना पाकिस्तान आर्थिक व लष्करी साहाय्य पुरवते हे जगजाहीर आहे. या संघटनांवर भारताने बंदी घातल्याने त्यांनी नव्या नावाने संघटना स्थापन केल्या असून त्यात स्थानिक काश्मिरी तरुणांची भरती केली जात आहे. १३ तारखेला झालेला हल्ला हा काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने केला असल्याचे समोर आले आहे. काश्मीरी टायगर्स ही जैश ए मोहम्मदचीच उपशाखा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे याचाच अर्थ जैश ए मोहम्मद सारख्या मोठ्या संघटना काश्मीरमध्ये पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. या दहशतवादी संघटना स्थानिक तरुणांना आणि महिलांना भडकावीत असून भारतीय पोलीस आणि लष्कराविषयी काश्मिरी जनतेच्या मनात द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्या या खेळीला काश्मीरमधील तरुण आणि महिला बळी पडल्याचे दिसत आहेत. फुटीरतावादी नेते काश्मिरी नागरिकांचे माथे भडकावत असून त्यांना भारताविरुद्ध फितवत आहेत.  काश्मीरमधील तरुण आणि महिला भारतीय लष्कराविरुद्ध हातात दगड घेऊन रस्त्यांवर उतरत आहेत. एकूणच काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा एकदा चिंतनीय बनत चालली आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्याची मोठी जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना रोखणे आणि स्थानिकांच्या मनात भारताविषयी विश्वास निर्माण करून देणे या दोन गोष्टींवर केंद्र सरकारने फोकस केला पाहिजे. काश्मीरमध्ये शांतता नांदवायची असेल तर केंद्र सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन  दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा बुरखा फडण्याचे काम केंद्र सरकारला करावे लागेल.

श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

COMMENTS