मुंबई: देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत ठाकरे ब

मुंबई: देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंनी रविवारी संयुक्त जल्लोष सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन करतो. आज कोणतीही निवडणूक नाही, पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. एका झुरळाने हुकूमशहाला हरवले आहे,” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
मुंबईतील सावरकर मार्गावर झालेल्या या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचा गौरव करण्यात आला, तसेच आंदोलनदरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या प्रारंभी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांची नावे उच्चारून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करत हा विजय लोकशाहीचा आणि देशभक्तीचा असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ संयमाने आणि चिकाटीने लढा दिला. कोणत्याही दबावाला न झुकता आंदोलन सुरू ठेवले आणि अखेर केंद्र सरकारला निर्णय बदलावा लागला. देशातील तरुणांनी इतिहासात नोंद होईल असा संघर्ष उभा केला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
तरुणांच्या एकजुटीचा विजय: राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र पोलिसांच्या संयमित भूमिकेचे विशेष कौतुक केले. आंदोलन आणि सभेच्या काळात पोलिसांनी शांतता राखण्यासाठी योग्य सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे म्हणाले, “हा दिवस केवळ भाषणांचा नसून विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करण्याचा आहे. देशभरातील तरुणांनी एकजूट दाखवत लोकशाही मार्गाने संघर्ष केला आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.” तसेच आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या.

COMMENTS