Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या पाठीशी आंबेडकरी जनता एकवटली

मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा दिला इशारा

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाकडून आंबेडकरी विद्यार्थ्यांना सापत्नपणाची वागणूक देत त्यांना मागासवर्गीय प्रशिक्षण संस्थांकडून देण्यात येणा

सचिव भांगे पालकमंत्री भुमरे, आ. शिरसाटांना ठरले भारी
बार्टीच्या प्रशिक्षण कार्यक्रमावर मंत्री देसाईंची उत्तर देतांना दमछाक
श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस

मुंबई/प्रतिनिधी ः सामाजिक न्याय विभागाकडून आंबेडकरी विद्यार्थ्यांना सापत्नपणाची वागणूक देत त्यांना मागासवर्गीय प्रशिक्षण संस्थांकडून देण्यात येणारे प्रशिक्षण बंद केल्यामुळे आंबेडकरी विद्यार्थ्यांसह, जनता संतप्त झाली असून, याप्रकरणी सामाजिक न्याय विभागाने तात्काळ निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराच आंबेडकरी समाजातील नेत्यांसह विविध संघटनांनी दिला आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात आंबेडकरी समाजामध्ये असंतोष वाढत असून, याविरोधात विजय घाटे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे संस्थापक, मिलिंद सावंत आंबेडकरवादी नेता, परभणी, एल. आर. कांबळे, हिंगोली, पावन कांडलीकर, नांदेड, शेषराव जल्हारे, वंचित बहुजन आघाडी, परभणी, सूचित सोनवणे, विद्यार्थी नेता छत्रपती संभाजी नगर यांनी दैनिक लोकमंथनजवळ आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आम्ही आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे असून, न्याय न मिळाल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराच या कार्यकर्त्यांनी, विचारवंतानी दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंबेडकरी विद्यार्थी आंदोलन करत असतांना देखील या आंदोलनाची दखल घेण्याची तसदी सामाजिक न्याय विभागाने घेतलेली नाही. उलट चुकीचा आणि दिशाभूल करणारे खुलासे करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून, याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचबरोबर आंबेडकरी समाजातून देखील सामाजिक न्याय विभाग आणि बार्टीबद्दल संताप व्यक्त होत असून, या विभागाने मागासवर्गीय संस्थांकडून या विद्यार्थ्यांचे त्वरित प्रशिक्षण सुरू करावे अन्यथा मंत्रालयावर थेट मोर्चा काढण्याचा इशाराच आंबेडकरी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व स्पर्धा परीक्षा केंद्राचा मोठा नावलौकिक असून, या विभागाकडून अनेक नाविण्यपूर्ण योजना राबवत आंबेडकरी विद्यार्थ्यांना नोकरी, रोजगार मिळवून देण्यात मोठा हातभार लावण्यात येत होता. मात्र सामाजिक न्याय विभागाने अनेक योजनांना कात्री लावत, आंबेडकरी विद्यार्थ्यांची गळचेपी करण्याचे धोरण राबवत त्यांचे प्रशिक्षणच बंद केल्यामुळे आंबेडकरी विद्यार्थी संतप्त झाले असून, त्यांनी महाराष्ट्र दिनापासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलने देखील सुरु केली होती. मात्र या आंदोलनाची दखल ना बार्टीने घेतली ना, सामाजिक न्याय विभागाने. त्यामुळे आता हा लढा आंबेडकरी जनताच हातात घेण्याच्या तयारीत आहे. सर्वपक्षीय आंबेडकरी संघटना आणि आंबेडकरी जनता यांच्या नेतृत्वाखाली थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवरची टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने दूर झाल्यामुळे सरकार आता गतीमान होवून निर्णय घेणे अपेक्षित असून, लवकरच या विभागाला नवे सामाजिक न्याय मंत्री देखील मिळतील, यात शंकाच नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून आंबेडकरी विद्यार्थी मागासवर्गीय प्रशिक्षण संस्था सुरू करा, असा टाहो फोडत असतांना, त्यांच्याकडे लक्ष देण्यास कोणत्याही राजकीय नेत्यांना, आणि सामाजिक न्याय विभागाला वेळ नसल्याची खंत दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागातून न्यायाची अपेक्षा असतांना, या विभागातील सचिव सुंमत भांगे यांचा हेकेखोरपणा, आणि आंबेडकरी विद्यार्थ्यांविषयी असलेल्या त्यांच्या भावना यामुळे हा विषय अद्यापही सुटू शकलेला नाही.

आम्ही अधिकार्‍यांच्या नव्हे तर, विद्यार्थ्यांच्या पाठीशी-सामाजिक न्याय विभागातील मंत्रालयातील सर्व अधिकार्‍यांच्या संपत्तीची जर एसीबीमार्फत खुली चौकशी केली तर, या विभागातील भ्रष्टाचार आणि अधिकार्‍यांकडे असलेली बेनामी संपत्ती उघड होईल. त्यामुळे आम्ही अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या पाठीशी नसून, आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. आंबेडकरी विद्यार्थ्यांची होणारी मुस्कटदाबी थांबवण्यासाठी आंबेडकरी संघटना मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे.

सामाजिक न्याय विभागाने आंबेडकरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडला आहे तो, आधी संपवावा. मागासवर्गीय प्रशिक्षण संस्थांकडून आंबेडकरी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण थांबवून सामाजिक न्याय विभागाने न्यायाशी एकप्रकारे द्रोह केला आहे. सातत्याने आंबेडकरी विद्यार्थ्यांवर अन्याय करून, त्यांना संपवण्याचे कट-कारस्थान रचण्यात येत असेल तर, ते खपवून घेतले जाणार नाही. अ‍ॅड. भास्कर उजागरे, आंबेडकरी वकील संघटना

मुख्यमंत्री महोदयांनी सामाजिक न्याय विभागात लक्ष घालून आंबेडकरी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाने बार्टीमार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण बंद पाडल्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतप्तेची भावना असून, याविरोधात आंबेडकरी समाज जनमताचा रेटा उभा करून, न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढू. त्याचे परिणाम सरकारने भोगण्यास तयार राहावे. श्रावण गायकवाड, अध्यक्ष आंबेडकरवादी संघर्ष समिती

आंबेडकरी समाजातील विद्यार्थी नोकरी मिळवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडतो आहे. बार्टीमार्फत देण्यात येणार्‍या प्रशिक्षणातून त्याला बळ मिळत होते. मात्र त्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण बंद करून, त्यांच्या रोजगाराचे, त्यांचे मुख्य प्रवाहात येण्याचे स्वप्नच सामाजिक न्याय विभागाने उद्धवस्त केले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाने ही चूक आतातरी सुधारावी, अन्यथा याविरोधात आम्ही आंबेडकरी समाजासह सर्वच संघटना एकत्र येवून, याविरोधात मोठा लढा उभारू. हा 78 हजार आंबेडकरी विद्यार्थ्यांचा प्रश्‍न असल्यामुळे आता सरकारला आंबेडकरी संघटनांचा इंगा दाखवून देवू, त्यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे.
लोकनेते विजय वाकोडे, राज्य उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना

COMMENTS