काठमांडू : नेपाळच्या आग्नेय भागातील मधेश प्रांतात उसळलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बालेन शाह यांनी नागरिकांना शांतता, संयम आणि

काठमांडू : नेपाळच्या आग्नेय भागातील मधेश प्रांतात उसळलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बालेन शाह यांनी नागरिकांना शांतता, संयम आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजातील संघर्षात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक पोलीस कर्मचारी व नागरिक जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संवेदनशील भागांत संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशात पंतप्रधान शाह यांनी सरकार या संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहत असल्याचे स्पष्ट केले. हिंसाचारात मृत्यू झालेल्या जयप्रकाश मेहता, ओमप्रकाश मेहता आणि गणेश यादव यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयामार्फत विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच, जखमींना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी अफवा, अप्रमाणित माहिती किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश कोणत्याही माध्यमातून प्रसारित करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. योग्य वेळी सर्वपक्षीय बैठक न बोलावणे आणि परिस्थिती हाताळण्यात आवश्यक नेतृत्व न दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री अनुपस्थित राहिल्यानेही सरकारवर टीका करण्यात आली. पंतप्रधान शाह यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची भेट घेऊन राज्यातील सुरक्षा परिस्थितीची माहिती दिली. मधेश प्रांतातील सिराहा, धनुषा आणि सुनसरी या जिल्ह्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण कायम असून काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापटी झाल्या. सिराहा येथे झालेल्या गोळीबारात किशोरवयीन गणेश यादव यांचा मृत्यू झाला, तर सुनसरी जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या जयप्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला. यापूर्वी ओमप्रकाश मेहता यांचाही मृत्यू झाला होता. हिंसाचारादरम्यान जाळपोळीच्या घटनाही घडल्याने प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. सिराहा आणि जनकपूरधाम येथील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, भारताच्या सीमेलगत असलेल्या पर्सा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

COMMENTS