मुख्य सचिव राजेश अग्रवाल मुंबई: शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान आ

मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुंबई: शासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड तंत्रज्ञान आणि डेटा सेंटरचा प्रभावी वापर करण्यावर राज्य शासन भर देत आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत महाराष्ट्राला एआयच्या वापरात देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने मंत्रालयात सुरू करण्यात आलेल्या ‘टेक थर्सडे’ (Tech Thursday) उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागामार्फत आयोजित या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, आयुक्त एस. भुवनेश्वरी यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
डेटा सुरक्षेसाठी ‘महा-एआय’ आणि ‘सर्वम’ मॉडेल
मुख्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, देशातील सुमारे ५० ते ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आणि एआय पायाभूत सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध असून हे नेतृत्व कायम राखण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पर्यावरणपूरक ‘ग्रीन डेटा सेंटर’ उभारणीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय माहितीची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ‘महा-एआय’ आणि ‘सर्वम’ सारखी एआय मॉडेल्स राज्याच्या स्वतःच्या सर्व्हर आणि जीपीयू (GPU) पायाभूत सुविधांवर कार्यरत आहेत. त्यामुळे संवेदनशील शासकीय माहिती बाह्य क्लाउड किंवा परदेशी सर्व्हरवर जाणार नाही.
शेतकऱ्यांना भिल्ली भाषेतही मार्गदर्शन
कृषी क्षेत्रात ‘अॅग्रि स्टॅक’च्या माध्यमातून १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत एआय-आधारित व्हॉइस बॉटद्वारे मार्गदर्शन पोहोचवले जात आहे. नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना भिल्ली भाषेतही सल्ला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना मसुदा तयार करणे, शासन निर्णय शोधणे आणि विधिमंडळ प्रश्नांची उत्तरे तयार करण्यासाठी एआय-आधारित साह्य उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘एजंटिक एआय’मुळे नागरिकांची कामे होणार सुलभ
‘महा-एआय’ हे संपूर्णपणे सुरक्षित आणि स्वायत्त व्यासपीठ आहे. भविष्यातील ‘एजंटिक एआय’ नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी अर्ज भरणे, डिजीलॉकरमधून आवश्यक कागदपत्रे मिळवणे किंवा विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी केवळ एआयशी संवाद साधावा लागेल. त्यानंतर अर्ज भरण्यापासून ते आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची सर्व कामे एआय स्वतःहून करेल. याशिवाय वीजबिल भरणे, सर्वात स्वस्त प्रवास तिकीट शोधून बुक करणे, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये टेबल आरक्षित करणे, ई-मेलला उत्तर देणे अशी अनेक दैनंदिन कामेही एजंटिक एआयच्या माध्यमातून स्वयंचलितपणे पार पडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘टेक थर्सडे’ उपक्रमातून तंत्रज्ञान साक्षरतेला नवी दिशा: सचिव वीरेंद्र सिंह
इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहावी, शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तंत्रज्ञान साक्षरता वाढावी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशासनाला चालना मिळावी, या उद्देशाने ‘टेक थर्सडे’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुमारे १३ वर्षांपूर्वी तत्कालीन माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव तथा विद्यमान मुख्य सचिव यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘टेक सॅटरडे’ या यशस्वी उपक्रमाचे नव्या स्वरूपातील रूपांतर म्हणजे ‘टेक थर्सडे’ हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS