चेन्नई : भारतीय चित्रपटसंगीताला आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने समृद्ध करणार्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या 88व्या वर्षी
चेन्नई : भारतीय चित्रपटसंगीताला आपल्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजाने समृद्ध करणार्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. ’दक्षिण भारताची कोकिळा’ म्हणून ओळखल्या जाणार्या या दिग्गज गायिकेच्या निधनामुळे संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. देशभरातील रसिक, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
’जानकी अम्मा’ या नावाने लोकप्रिय असलेल्या एस. जानकी यांनी सहा दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसंगीतावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या सुरेल आवाजाने अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि असंख्य गीते अजरामर केली. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेपाल्ले तालुक्यातील पल्लापाटला या गावात 23 एप्रिल 1938 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आयुर्वेदिक वैद्य होते. लहानपणापासूनच संगीताची ओढ असल्याने अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी प्रथम सार्वजनिक गायन केले. त्यानंतर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत त्यांनी आपल्या गायनकलेला अधिक परिपूर्ण केले. वयाच्या सुमारे विसाव्या वर्षी त्या चेन्नई येथे दाखल झाल्या. तेथे त्यांना संगीतकार आर. सुदर्शनम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ’विधीयिन विळयाट्टू’ मधून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एस. जानकी यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीसह सुमारे वीस भाषांमध्ये तब्बल 48 हजारांहून अधिक गीते गायली. त्यांच्या गायकीने केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संगीतविश्व समृद्ध केले. विविध भाषांतील त्यांच्या गीतांना देशभरातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

COMMENTS