चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंड

चंद्रपूर : उदरनिर्वाहासाठी परराज्यात जाऊन भात लावणीचे काम करणार्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजुरांवर दुर्दैवी संकट कोसळले आहे. तेलंगणातील रामगुंडम परिसरात शेतमजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 27 जण जखमी झाले आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील पवना चक येथील अनेक शेतमजूर दरवर्षीप्रमाणे यंदाही भात लावणीच्या हंगामी कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. दिवसभर शेतातील काम पूर्ण करून सर्वजण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतत असताना रामगुंडम परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ते रस्त्यावर उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की, चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल वासुदेव सोनले (वय 45), अर्चना जनार्धन सोनले (वय 40), प्रभा सिताराम मोहर्ले (वय 56) आणि रंजना प्रभाकर शेंडे (वय 50) यांचा समावेश आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या 27 मजुरांना स्थानिक नागरिक, पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने रामगुंडम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय आणि गावाकडे धाव घेतली. अचानक आलेल्या या दुःखद बातमीने कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून अनेकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. उदरनिर्वाहासाठी घरापासून दूर गेलेल्या कष्टकरी मजुरांवर नियतीने घात केलेला हा आघात संपूर्ण परिसराला हादरवून गेला आहे.

COMMENTS