अहिल्यानगर: मोहरम हा केवळ इस्लामी नववर्षाचा प्रारंभ किंवा धार्मिक स्मरणाचा काळ नसून, तो त्याग, सत्य, न्याय, संयम आणि मानवतेच्या मूल्यांची आठवण कर

अहिल्यानगर: मोहरम हा केवळ इस्लामी नववर्षाचा प्रारंभ किंवा धार्मिक स्मरणाचा काळ नसून, तो त्याग, सत्य, न्याय, संयम आणि मानवतेच्या मूल्यांची आठवण करून देणारा पवित्र महिना आहे. करबला येथे इमाम हुसैन (र.अ.) यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहून सत्य आणि न्यायासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांचा संदेश आजही संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही, गरजूंची मदत करायची आणि समाजात प्रेम, बंधुता व मानवतेची भावना जपायची, हेच आपल्याला इमाम हुसैन यांनी शिकवले असल्याचे प्रतिपादन शफी हज टुर्सचे संचालक हाजी आलम खान यांनी केले.
मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहेमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने, मोहरमचे औचित्य साधून शफी हज टुर्सच्या सहकार्याने गोविंदपुरा येथील फकीरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शफी हज टुर्सचे संचालक हाजी आलम खान, सामाजिक कार्यकर्ते तनवीर चष्मावाला, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापिका अंजुम अब्दुल गफुर शेख, दिलशाद मुसा शेख, सुम्मैया मोसिन पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सामाजिक कार्यकर्ते तन्वीर चष्मावाला म्हणाले की, आजच्या काळात अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळते आणि समाजात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होते.

COMMENTS