संगमनेर: ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने आज होणारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. या परीक्षेला यंदा ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवार बसणार ह

संगमनेर: ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने आज होणारी परीक्षा रद्द करावी लागली आहे. या परीक्षेला यंदा ४ लाख २८ हजारांहून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी नीट (NEET), सीबीएसई (CBSE) मूल्यांकनातील गोंधळ, विविध प्रवेश व भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये येणारी उदासीनता आणि मानसिक नैराश्य अत्यंत गंभीर असून, हे सर्व शिक्षण विभागातील भ्रष्टाचारामुळेच होत असल्याची तीव्र टीका आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
शिक्षकांच्या स्वप्नांवर घाला घालण्याचे पाप
टीईटी परीक्षा पेपर फुटीबाबत बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, टीईटीची केस थोडी वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे २०-३० वर्षे सेवा केलेले शिक्षक, जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहेत, त्यांना सुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एकप्रकारे घाला घालण्याचंच पाप या व्यवस्थेने केले आहे.
जग एआयच्या युगात, आपण मात्र मागेच!
आता देशाला स्वातंत्र्य मिळून लवकरच जवळपास ८० वर्षे होतील. जग आज एआय (AI) आणि सायबर सुरक्षेच्या युगात पोहोचले आहे, पण आपण अजूनही एक पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा व्यवस्था उभी करू शकलो नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आजही आपण एमपीएससीचे (MPSC) निकाल वेळेवर देऊ शकत नाही; परीक्षा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन घेतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
या सर्वच विषयांवर मी परवाच विधिमंडळात आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले होते. खरंतर भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच ही व्यवस्था जाणीवपूर्वक सुधारली जात नाही. ही सिस्टीम सुधारूच नये आणि व्यवस्था पारदर्शक होऊच नये, अशीच काहींची मानसिकता आहे, हे माझे ठाम मत असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

COMMENTS