नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात गेल्या तब्बल सहा महिन्यांपासून दूषित व घाणेरड्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकां

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील गांधीनगर परिसरात गेल्या तब्बल सहा महिन्यांपासून दूषित व घाणेरड्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. विशेषतः वर्कशॉप झोन परिसरातील नागरिकांना दररोज गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ पाणी मिळत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांवर आजारपणाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या समस्येबाबत अनेक वेळा महानगरपालिका प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे चार नगरसेवक प्रतिनिधित्व करत असतानाही नागरिकांच्या या मूलभूत समस्येकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. “मागासलेली वस्ती असल्यामुळे आमच्या प्रश्नाकडे अधिकारी व लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
दूषित पाण्यामुळे गांधीनगर परिसरात पोटाचे विकार, अतिसार, कावीळ आणि टायफॉईड यांसारख्या जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये (पाईपलाईन) गळती होऊन त्यात सांडपाणी मिसळत असल्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ या गळतीचा शोध घेऊन शुद्ध पाणीपुरवठा सुरू न केल्यास महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गांधीनगरमधील नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS