नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही मतदार नगरसेवकांशी संपर्क होत नसल्

नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही मतदार नगरसेवकांशी संपर्क होत नसल्याने निर्माण झालेल्या चर्चांवर भाजपचे खासदार तथा ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी प्रथमच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला मदत करणाऱ्या सदृश आणि अदृश्य शक्ती या सगळ्याच आमच्यासोबत आहेत,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार अमर राजुरकर यांच्या एकतर्फी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना अनेक नगरसेवक ’नॉट रिचेबल’ असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनिअर प्रशांत इंगोले यांनी काही मतदार नगरसेवक संपर्काबाहेर असल्याचा आरोप करत निवडणूक निरीक्षकांकडे रीतसर तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले की, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्याने काही लोक मुलांना घेऊन बाहेर फिरण्यासाठी गेले असतील. शाळा पूर्णपणे सुरू व्हायला अजून आठवडाभराचा कालावधी असल्याने १८ तारखेनंतर सर्वजण परत येतील.
विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण यांनी ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी असल्याचा दावा केला. “मतदार आमच्या उमेदवारांना भेटत असून त्यांनी आपला पाठिंबा आधीच स्पष्ट केला आहे; मात्र ते इतरांना का भेटत नाहीत, हे मला माहीत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच अमर राजुरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. नांदेडला स्थानिक आणि पूर्णवेळ पालकमंत्री मिळण्याबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे सांगत त्यांनी नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र सरकारने ५० टक्के हिस्सा उचलण्याची तयारी दर्शवली असल्याचे स्पष्ट केले.

COMMENTS