बीड : पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जाहीर

बीड : पंढरपूर येथे आमदार रोहित पवार यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केली आणि आंदोलनाला सक्रिय समर्थन दर्शविले.
राजेंद्र आमटे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने सर्वप्रथम कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर अशा आंदोलनांची शृंखला सुरू झाली आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकर्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत त्यांनी याविरोधात जनजागृती मोहीम राबविण्याचा इशारा दिला. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा गावोगावी जाऊन सरकारच्या फसव्या कर्जमाफी योजनेबाबत जनजागृती करेल आणि संबंधित शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करेल, असे आमटे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी नेते बच्चू काडू यांच्यावरही टीका केली. नागपूर आंदोलनानंतर शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळवून देण्याऐवजी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काम केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले. शेतकर्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच सर्व पात्र शेतकर्यांचे सातबारे कोरे करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी संपूर्ण बीड जिल्ह्यात शेतकरी जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही राजेंद्र आमटे यांनी दिली. या प्रसंगी अशोकराव येडे पाटील, सादेकभाई सय्यद, आकाश आमटे, मोहन गव्हाणे, महादेव आमटे, सोनू शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS