Homeताज्या बातम्या

नांदेडकरांवर ‘स्मार्ट मीटर’चा दबाव? अखंड वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरलेल्या महावितरणची नवी मोहीम

नांदेड : महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसमोर आता 'स्मार्ट मीटर'चे नवे संकट

वीज बिलांचा गोंधळ थांबवा; ग्राहकांना मनस्ताप देणाऱ्या चुकीच्या आकारणीविरोधात नांदेडमध्ये संताप
नांदेड जिल्ह्यातही ‘कोचिंग संस्कृती’चा वाढता प्रभाव; महाविद्यालयांतील उपस्थिती घसरली!
एलसी आणि गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर वसुली? शिक्षण विभागाच्या आदेशाला तामसा येथील शाळेकडून केराची टोपली
Smart Meter Issue: Automatic Power Cut in Dindori & Nandurbar | स्मार्ट  मीटरमुळे वीज पुरवठा खंडित

नांदेड : महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांसमोर आता ‘स्मार्ट मीटर’चे नवे संकट उभे ठाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेड शहरातील हजारो वीज ग्राहकांना महावितरणकडून व्हॉट्सॲपवर (WhatsApp) स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.

महावितरणकडून पाठविण्यात आलेल्या संदेशात सध्याचे वीज मीटर बदलून अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या संदेशानंतर नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ होणार का? भविष्यात प्रीपेड वीज प्रणाली लागू होणार का? वीज वापरावर अधिक नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्टपणे मिळालेली नाहीत.

नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये वर्षांनुवर्षे वीजपुरवठ्याच्या समस्या कायम आहेत. पावसाळा सुरू झाला की रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळणे, तारांमध्ये बिघाड होणे, तासनतास वीज गायब राहणे, कमी दाबाचा (लो व्होल्टेज) वीजपुरवठा अशा समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो. उन्हाळ्यात अनेक भागात १२ ते २४ तास वीज खंडित राहिल्याच्या घटना घडल्या. अनेकदा नागरिकांनी आंदोलने करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसून आला नाही.

अशा परिस्थितीत मूलभूत सेवा सुधारण्याऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यावर भर दिला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे. “पावसाचा एक शिडकावा झाला तरी वीज गायब होते. अनेक भागात ट्रान्सफॉर्मर जळतात. तक्रारी करूनही अधिकारी वेळेवर दखल घेत नाहीत. आधी सुरळीत वीज द्या आणि नंतर स्मार्ट मीटरचे फायदे सांगा,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

राज्य सरकारने यापूर्वी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विधानसभेतही या विषयावर चर्चा झाली होती. त्यामुळे आता अचानक ग्राहकांना संदेश पाठवून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सरकार आणि महावितरणच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या मते, लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे; अन्यथा जनतेमध्ये अविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती तात्काळ उपलब्ध होईल, बिलिंगमध्ये पारदर्शकता येईल आणि चोरीला आळा बसेल, असे महावितरणचे म्हणणे आहे. मात्र, देशातील काही भागांत स्मार्ट मीटरनंतर वाढीव बिलांच्या तक्रारी समोर आल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सामान्य ग्राहकांच्या मनात सध्या तीन प्रमुख प्रश्न:

  • वीजबिल वाढणार नाही ना?
  • भविष्यात प्रीपेड पद्धती लागू होणार नाही ना?
  • स्मार्ट मीटर बसविणे ऐच्छिक आहे की सक्तीचे?

या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याने संभ्रम अधिकच वाढत आहे.

COMMENTS