पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरपूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता निर्ण

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरपूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी दैनंदिन पातळीवर वेगाने सुरू असून आतापर्यंत ५३ महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. येत्या काही आठवड्यांतच या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, हा खटला राज्यातील सर्वात जलद गतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक ठरू शकतो.
१ मे रोजी नसरपूर परिसरात साडेतीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्पावधीत तपास पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयात सुमारे ११०० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात आले. विशेष न्यायालयात २९ मे पासून प्रत्यक्ष साक्ष नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पीडित मुलीच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीविरुद्ध अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक, तांत्रिक आणि वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. डीएनए (DNA) अहवालांसह विविध तज्ज्ञांचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. तसेच एका महत्त्वाच्या बालसाक्षीदाराची साक्षही न्यायालयाने विशेष काळजीपूर्वक नोंदवून घेतली. आधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने सादर करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांची नोंदणीही पूर्ण झाली आहे.
आतापर्यंत ५३ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली असून आता केवळ दोन महत्त्वाचे साक्षीदार शिल्लक आहेत. यामध्ये सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी (IO) यांचा समावेश आहे. सोमवार, १५ जून रोजी या दोघांच्या साक्षी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू होण्याची अपेक्षा आहे.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की, “प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाकडून सातत्याने सुनावणी घेतली जात आहे. उपलब्ध पुरावे आणि साक्षींची नोंद वेगाने पूर्ण होत असल्याने महिनाभराच्या आत निकाल लागण्याची शक्यता आहे. पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत.” पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या या जलद कारवाईमुळे पीडित कुटुंबासह संपूर्ण समाजाचे लक्ष आता अंतिम निकालाकडे लागले आहे.

COMMENTS