नागपूर : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती आणि मह

नागपूर : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा होताच विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसतानाच, चंद्रपूर-गडचिरोली परिसरात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे अनेक नगरसेवक आणि काही पदाधिकारी अचानक संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच काही महत्त्वाचे नगरसेवक यांचे दूरध्वनी बंद असल्याचे समोर आले आहे. याशिवाय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसशी संबंधित सुमारे साठहून अधिक नगरसेवक संपर्कात नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पक्षातील नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. विधानपरिषदेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींच्या मतदानातून होत असल्याने प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून आपल्या मतदारांची तटबंदी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे ६० नगरसेवक भाजपच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काही लोकप्रतिनिधींना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याच्याही चर्चा सुरू आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अद्याप कोणत्याही पक्षाने चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसतानाही पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीपूर्वीच मतदारांची बांधणी सुरू झाल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी काही नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून दूर नेले जात असल्याचा गंभीर आरोप केला. “निवडणुकांमध्ये पैशांचा प्रभाव वाढत चालला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याची माहिती मिळत आहे,” असे ते म्हणाले. तसेच, राजकारणात वाढत चाललेल्या पैशाच्या प्रभावामुळे सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपती आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य घटकांचे वर्चस्व वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS