मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात रेल्वे मार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने अखेर मोठी कारवाई सुरू केली

मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात रेल्वे मार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने अखेर मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे.
गरीबनगर परिसरातील रेल्वेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर झोपड्या आणि व्यावसायिक बांधकामे उभारण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सुमारे पाच हजार चौरस मीटर क्षेत्रावर हे अतिक्रमण पसरले होते. यात चारशेहून अधिक पक्क्या झोपड्या आणि दुकाने होती. सार्वजनिक मालमत्ता कायद्यानुसार ही जमीन रेल्वेची असल्याचे प्रशासनाने न्यायालयात सिद्ध केले होते. सन 2017 पासून या प्रकरणावर न्यायालयीन सुनावण्या सुरू होत्या. स्थानिकांकडून विविध स्तरांवर याचिका दाखल करण्यात आल्याने कारवाई वारंवार पुढे ढकलली जात होती. अखेर न्यायालयाने रेल्वेला अतिक्रमण हटवण्यास परवानगी दिल्यानंतर पोलिस बंदोबस्तात दोन दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान अनेक रहिवाशांनी घरातील साहित्य बाहेर काढण्याची धावपळ केली. घरगुती वस्तू, फर्निचर, शीतकपाट आणि इतर संसारोपयोगी साहित्य रस्त्यावर आणण्यात आले होते. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शवला, तर अनेकांनी आधीच घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती.

COMMENTS